Thursday, September 29, 2011

५ मार्च १९६९ : एक पत्रक

'सत्यकथा' या वाङ्मयीन मासिकाची प्रतिकात्मक होळी करून करून प्रस्थापित व्यवस्थेवरचा आपला राग व्यक्त करण्याचा प्रयत्न अनियतकालिकांशी संबंधित काही 'तापसी तरुणां'नी केला. या सगळ्या साठच्या दशकातल्या गोष्टी. मराठी लोकांच्या एकूण सांस्कृतिकपणाला साचलेपणा आलाय, काही मोजक्या लोकांपुरतंच हे सगळं मर्यादित राहिलंय, तर ही कोंडी फोडूया, असं लक्षात आल्याने या लोकांनी काहीनाकाही करण्याचा प्रयत्न केला. साहित्यातून आणि यातल्या काहींनी नंतर राजकीय भूमिका घेऊन हे करण्याचा प्रयत्न केला. आता लोक विसरूनसुद्धा गेले. मुळात अनेक गोष्टी, संदर्भ पूर्णपणे बदलूनही गेले. तूर्तास हे एक पत्रक, थोडा अंदाज येण्यासाठी-- (अजून थोडे संदर्भ इथे स्पष्ट होतील). या पत्रकात सगळीच नावं आल्येत असं नाही, त्यामुळे या पत्रकावरून कोणी अति अंदाज बांधण्याचा प्रयत्न करू नये, या ब्लॉगची सुरुवात या पत्रकाने करणं जरा बरं वाटल्याने तसं केलंय.
***

जाहीर बोलावणे

श्री.........यांस,
आमचे येथे आमचे कृपेकरून मराठीतील उच्चभ्रू मासिकांची होळी करण्याचे घाटत आहे. या निमित्ताने सत्यकथेच्या एका अंकाची होळी केली जाईल. या प्रसंगी सुप्रसिद्ध तापसी तरुण हजर राहतील. उदाहरणार्थ विख्यात बोंबलभाड्या राजा ढाले : थोर बोंबलभिके अशोक शहाणे + भालचंद नेमाडे + रमेश रघुवंशी + एकनाथ पाटील + तुळसी परब + वसंत गुर्जर. तरी दिनांक पाच मार्च एकोणिशेएकोणसत्तर रोजी ठीक सायंकाळी सहा वाजता खटाववाडीच्या गल्लीत इष्ट मित्र-मैत्रिणींसह उपस्थित राहून या मंगल समारंभाला शोभा आणावी.

- राजा ढाले, तुळसी परब, वसंत गुर्जर

***

हा ब्लॉग कवी तुळसी परब यांच्याविषयी काही गोष्टी एकत्र जमवून ठेवण्याचा प्रयत्न आहे.

Monday, September 26, 2011

तुळसीबद्दल

- वंदना सोनाळकर
'साक्षात' (जानेवारी-फेब्रुवारी-मार्च २००४) तुळसी परब विशेषांकामधून

ज्या माणसाबरोबर आपण पंचवीस वर्षं संसार केला आहे त्याच्याविषयी लिहायचे तर मला स्वतःबद्दल आणि आमच्या कुटुंबाबद्दलही लिहावे लागेल. कदाचित या अंकाच्या वाचकांना याच्यात फारसा रस नसेल. परंतु जसा एखादा पर्यटक 'पॅकेज टूर'चे पैसे भरतो आणि त्याला व्यवस्थापकांनी निवडलेल्या सर्व स्थळांना भेट द्यावीच लागते त्याचप्रमाणे इथे कवीबद्दल वाचताना वाचकांना एक अर्थशास्त्राची शिक्षिका, एक नुकताच पदवी मिळालेला वास्तुशिल्पकार (ओजस) आणि एक दहावीतला विद्यार्थी (दर्यन) यांचीही भेट घ्यावी लागेल. हा केवळ एक स्त्रीवादी हट्ट नाही.

पंचवीस वर्षांचा काळ मोठा आहे. १९७७ ते २००२ हा काळ कवी तुळसी परब यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कवितासंग्रहामधील अंतराचा देखील आहे. कवीच्या जीवनात या काळात बरेच काही घडले, त्याबरोबर जगात आणि आपल्या समाजातही मोठे बदल झाले आहेत. कोणत्याही चांगल्या लेखकाच्या लेखनात या बदलांचे प्रतिध्वनी सापडतातच. आणि ज्या कवीच्या वैशिष्ट्यांमध्ये त्याची राजकीय बांधिलकी, त्याची समाजाभिमुख भूमिका यांचा प्रकर्षाने उल्लेख केला जातो, अशा कवीच्या जीवनात त्यांना महत्त्वाची जागा आहे. तो या बदलांना कसा सामोरा जातो, त्यांचे धक्के खातो, उभा राहतो, स्वतःला बदलतो किंवा बदलण्यास नकार देतो, हे सर्व मी जवळून पाहिले आहे. ३१ ऑक्टोबर १९७७ रोजी आमचे लग्न झाले. आम्ही विवाहबद्ध झालो, सहजीवन पत्करले. शब्द कोणतेही वापरा. तेव्हा इंदिरा गांधींची आणीबाणी नुकतीच संपुष्टात आली होती. मिसा (मेन्टेनन्स ऑफ इंटर्नल सिक्युरिटी अॅक्ट) खाली दहा महिन्यांचा कारावास सोसून तुळसी परब मार्चमध्ये बाहेर आले होते. इंदिरा गांधींच्या सरकारचा पराभव करणाऱ्या युतीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही देशाच्या राजकारणात पुन्हा प्रवेश मिळाला होता. या घटनेचे महत्त्व आम्हाला त्यावेळी लक्षात आले नव्हते.

त्यावेळी मी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर कॉलेजमध्ये शिकवत होते. मी १९७४ साली इंग्लंडहून परतले होते. त्याआधी मी लहानपणापासूनचा जवळजवळ सर्वच काळ परदेशात राहिले होते. संगमनेरसारख्या ठिकाणी नोकरी करण्याचा माझा निर्णय आणि तुळसीबरोबर लग्न करण्याचा निर्णय, हे दोन्ही धाडसाचे निर्णय होते असे म्हणता येईल. तुळसीचेही तेवढेच धाडस. मागे पाहताना असे वाटते की, एका बाजूला आम्ही दोघे अगदी एकमेकांशी जमीन-आसमानचा फरक असलेल्या वातावरणात लहानाचे मोठे झालो असलो, तरी दोघांमध्ये एक गोष्ट समान होती. दोघेही शहरी संस्कृतीत वाढलो, मात्र दोघांनीही ग्रामीण भागात राहून काम करणे पत्करले होते.

नंतर तुळसीच्या काही साहित्यिक मित्रांनी सुचविल्याप्रमाणे औरंगाबादेत विद्यापीठाची नोकरी मिळवली आणि आम्ही औरंगाबादेत १९७९ साली आलो. तेव्हापासून दोन-तीन वर्षे सोडली तर आम्ही इथेच आहोत.

तुळसीच्या स्वभावामध्ये एक विशिष्ट प्रकारचा विरोधाभास आहे. एका बाजूला त्याची साहित्य व दृष्य कलांची जाण प्रगल्भतेची, सूक्ष्मतेची आहे, तो नवीन कलाकृतींना स्वीकारण्यास नेहमी तयार असतो. दुसऱ्या बाजूला त्याच्या भाषेत आणि वागणुकीत जो रांगडेपणा आहे, तो जपण्यासाठी तो जीवापाड प्रयत्न करायला तयार असतो. त्यामुळे आमच्या सहजीवनाच्या काळात चढउतार झाले असतील, काही काळ आमच्या तीव्र संघर्ष झाला असेल, पण त्या एकत्र जगण्यात तोचतोचपणा किंवा कंटाळा याला काही जागा राहिली नाही.

आमच्या घरात सतत वाद चालू असतात आणि तेही बऱ्याचदा उच्च स्वरात. आम्ही दोघेही आपला मुद्दा सोडायला, पराभव स्वीकारायला फारसे तयार नसतो. तरीही आम्ही एकमेकांच्या म्हणण्याला किंमत देत नाही असे नाही. आमचे जवळचे मित्र प्रताप भोसले सुरुवातीच्या काळात असे म्हणायचे की, तुमच्या भांडणातून मला काही शिकायला मिळते. अर्थात आमच्या दोन्ही मुलांवर या वातावरणाचा प्रभाव पडला आहे. त्यामुळे ते देखील आमच्याशी उच्च स्वरात वाद घालायला मागेपुढे बघत नाहीत. त्यात तुळसीच्या तोंडात शिव्याही सहजपणे येतात आणि आपली बाजू कमजोर असली तर तो विवेकाचा त्याग करण्यात तत्परही असतो. तरी हा सगळा प्रकार भांडणापेक्षा वादाचाच असतो. आमचे सगळे काही एकमेकांसमोर अगदी उघड होत असते. तत्त्वांचा, सवयींचा, मूळ हेतूंचा, आवडीनिवडींचा आडवा तिडवा विचार केला जातो. यात कधीच कटुता येत नाही असे नाही. मोठ्या मुलाचा स्वभाव मुळात शांत असल्यामुळे त्याला बऱ्याच तडजोडी करून काही गोष्टी विनोदाने घेण्याचे शिकावे लागले. धाकटा मात्र तुळसीचीच रणनीती त्याच्यावर उलटवायला शिकला आहे. आणि या सर्व प्रकरणातून एक लवचिकता, खुलेपणा, स्वातंत्र्य, कसे माहीत नाही, पोचसे जाते सगळ्यांसाठी.

अर्थात या सगळ्या तीव्रतेने नटलेल्या सततच्या कौटुंबिक देवाणघेवाणीची एक किंमतही द्यावी लागते. आम्ही दोघे आपल्या क्षेत्रात काबिल असूनही फारसे महत्त्वाकांक्षी राहिलो नाही. याचाच परिणाम, तुळसीचा तिसरा संग्रह निघायला पंचवीस वर्षे लागण्यामध्ये आणि माझे करिअर पुढे न सरकरण्यामध्ये दिसून येतो.

तुळसीच्या या तिसऱ्या संग्रहाच्या काही परीक्षकांनी त्याच्या स्त्रियांविषयीच्या दृष्टिकोनाची प्रशंसा केली आहे. हे वाचून मला पहिल्यांदा थोडासा धक्का बसला, मात्र विचार केल्यानंतर फारसे आश्चर्य वाटले नाही. तुळसीच्या तोंडातून अनेकदा अत्यंत पुरुषप्रधान अशी विधाने बाहेर पडतात. त्याचे वर्तनही तसे असते. परंतु या सगळ्यामागे तुळसीच्या काही भूमिका असतात. एक, तो स्वतःला बदलायला तयार असतो. फार सहजपणे नाही, पण कालांतराने तो बदलतो. दुसरी गोष्ट म्हणजे, त्याची वागणूक ही वर्ग-जात-लिंगभाव-सदृश अस्तित्वात पाय रोवलेली असते. तो ज्या वातावरणात आणि वास्तवात लहानाचा मोठा झाला, त्याने तारुण्यात जी मूल्ये स्वीकारली, त्यांच्यापासून फारकत घ्यायला तो सहजासहजी तयार होत नाही. तो एका विशिष्ट काळात मुंबईतील कामगार वस्तीत एका चाळीत वाढला, त्या वास्तवाशी त्याची बांधिलकी पूर्णपणे तुटत नाही. तो आज एक मध्यमवर्गीय जीवन जगत असला तरी या जीवनाशी तो कधीच समरस होत नाही. एका कामगारवर्गीय पुरुषाला एका सुखवस्तू जीवन जगलेल्या उच्चवर्णीय स्त्रीबद्दल जो संशय वाटतो, तो तुळसी नाहीसा होऊ देत नाही. वैयक्तिक पातळीवर दीर्घकाळ सहजीवनातून एक मोठा विश्वास दोन्ही बाजूने निर्माण झाला असला तरी. या भूमिकेचा मला बराच त्रास झाला आहे हे नाकारता येणार नाही. काही काळ मला स्वतःची सृजनशीलता जपण्यासाठी त्याच्यापासून जरा अंतर घेऊन राहणेही जरूरीचे वाटले आहे. मात्र तुळसीचा मोठेपणा याच्यात आहे की, मी जेव्हा इंग्रजीत वयाच्या चाळीशीनंतर काही कविता लिहिल्या तेव्हा त्याने त्याचे मनापासून कौतुक केले. माझ्या दोन-तीन कविता एका प्रतिष्ठित त्रैमासिकात छापून आल्या तेव्हा तो माझ्या आनंदात पूर्णपणे सामील झाला. मला कामाच्या निमित्ताने देशभर प्रवास करण्याची संधी मिळाली तेव्हा त्याने कधी तक्रार केली नाही.

तुळसीला शहरात फिरण्याचा मोठा शौक. आणि तेही पायी. अर्थात, महाराष्ट्रात मुंबई सोडून दुसरे खरे शहर नाही असे त्याचे मत आहे. तरी तो औरंगाबादेत असाच शौक म्हणून फिरतो. आमचा मोठा मुलगा ओजस लहान होता तेव्हा तो त्यालाही बरोबर घेऊन शहरामध्ये फिरायचा. कधीकधी 'आज शाळेत नको जाऊस. आपण फिरू या. शाळेत जेवढे शिकता येते, त्याच्यापेक्षा जास्त शाळेबाहेरही शिकायला मिळते', असे त्याचे म्हणणे असते. अर्थात मीही या 'मधून-मधून शाळा बुडवण्याच्या' छंदाला कधी विरोध केला नाही. असा तो फिरून आल्यावर आपण जर विचारले, कुठे गेलास, काय केलेस, कोण भेटले, तर याचे सरळ उत्तर मिळणार नाही. तो काहीतरी काम पूर्ण करण्यासाठी जरी बाहेर पडला असला, तरी ते झाले का? असे विचारल्यावर सोपे उत्तर मिळत नाही. तो कसा अमूक अमूक ठिकाणी गेला, मग तिथली माणसे कशी होत, ते काय काय म्हणाले, एवढेच नाही तर च्यायला ते असे का बोलले आणि आपण त्यावर काय बोललो, हे त्याच्या पद्धतीने त्याच्या वेगाने ऐकावे लागतेच. अगदी आपल्या हातात घड्याळ नसले आणि किती वाजले विचारले तरी असेच. अशा प्रकारे त्याच्याबरोबर, म्हणजे त्याच्यामागे पुन्हा शहरभर फिरून यायला कधी मजाही वाटते, पण हे सगळे ऐकत बसायला नेहमीच वेळ असतो का? आणि त्याच्या पिढीतल्या बहुसंख्य नवऱ्यांप्रमाणे, घरातली कामे करताना, आपण ही कामे करतो ही अगदी मोठ तात्विक भाषण देण्याजोगी अजब घटना आहे, असेही असते आणि शेवटी मी हे करतो ही काय अजब गोष्ट आहे का? मी तर हे अनेक वर्षांपासून रोजच करतोय... वगैरे.

आमचे लग्न झाले तेव्हा तुळसीची युरोपीय कवितांची जाण पाहून मी चकीतच झाले होते. त्या काळात पुस्तकं स्वस्त होती आणि त्याच्याकडे मार्क्सवादी साहित्याचा आणि कवितांचा मोठा संग्रह होता. आम्ही या दोन्ही प्रकारच्या पुस्तकांचे एकत्र वाचनही केले. नंतर फारसा वेळ मिळाला नाही, तरी तुळसीकडून कविता वाचून घेण्यात मी अजूनही रमते. ग्रंथालयात आठ आठ तास बसून वाचण्याची आवड तुळसी अलिकडे वरचेवर जोपासू शकला नाही. पण त्याचे वाचन सतत चालू असते. ते सगळे गांभीर्याचे असते. तो विनोदी लेखन क्वचितच वाचतो, 'पॉप्युलर फिक्शन'ला हातही लावत नाही. आणि जे काही वाचलेले असेल ते त्याला सांगायचेही असते. मनाला ताण आल्यावर तुळसीला 'मारामारीचे' विशेष म्हणजे अमिताभ बच्चनचे चित्रपट टी.व्ही.वर पाहायला आवडतात. आणि तो या चित्रपटांच्या कथनकामध्ये अगदी लहान मुलासारखा मग्न होतो.

विज्ञान हे आपले क्षेत्र नाही, वैज्ञानिक बाबींच्या तपशिलात आपल्याला रस नाही, ही तुळसीची ठाम भूमिका असते. घरातल्या विजेच्या उपकरणांबरोबर त्याचे नाते मुळात संशय आणि किंचित भीतीचे असते. पण याबाबतच्या सुरक्षिततेचे पथ्य तो अगदी काळजीपूर्वक आणि काटेकोर पद्धतीने पाळतो. घरातल्या संगणकापासून तो दोन वर्षांच्या काळात जरा फटकूनच राहिला आहे. तात्विक पातळीवर तो विज्ञानाच्या नवीन शोधांबद्दल खुलं मन ठेवतो, पण तपशील समजून घेण्याची तसदी घेत नाही. तात्विक पातळीवर नास्तिक असणे, अंधश्रद्धांना विरोध करणे हा त्याच्या तरुणपणातील बंडाचा भाग होता आणि आजही त्याच्यासाठी ते महत्त्वाचे आहे. जिथे तो मोठा झाला तेथील कामगार वर्गीय कोकणी संस्कृती, लोकांचा भुताखेतांवरचा विश्वास, एकमेकांविषयीचा संशय, एकमेकांमध्ये गुंतण्याची पद्धत या सगळ्यांच्या विरोधात त्याने बंड केले आहे आणि तरीही त्याचा एक भावनिक प्रतिध्वनी त्याच्या बोलण्याच्या लयीत, त्याच्या वागणुकीत अजूनही उमटतो. हा एक विरोधाभास वाटला, परंतु कवी म्हणून त्याच्या लेखनात या गोष्टी एक बहुसूत्रीपणा आणतात. तुळसी एक व्यक्ती म्हणून अनेकदा काही भूमिकांना अगदी हट्टीपणाने धरून ठेवतो, मात्र त्याचे कलात्मक विश्व त्यापेक्षा गुंतागुंतीचे असते. हे समजायला मला अनेक वर्षे लागली. जेव्हा मी तुळसीला, त्याच्या घराच्या माणसांना अगदी जवळून पाहिले आणि त्यांच्याशी भावनिक नाते जोडले तेव्हा ते शक्य झाले.

कोणतीही नवीन गोष्ट स्वीकारताना किंवा नाकारताना तुळसीने जगाशी वागताना स्वीकारलेली भूमिका त्याच्यासाठी महत्त्वाची असते. मग अगदी डॉक्टरकडे जाण्यासारखा साधा प्रसंग असला तरी हॉस्पिटलची प्रशासनपद्धती आणि त्यातील विविध पात्रे, डॉक्टरची रुग्णांशी वागण्या-बोलण्याची पद्धत, इतर रुग्णांचे वर्तन, या सगळ्यांना त्याला तीव्र वैयक्तिक आणि 'इगोवादी' प्रतिसाद द्यायचा असतो. हे सगळे खूप व्यक्तिकेंद्री वाटेल. पण तुळसीची ही स्वतःची भूमिकासुद्धा एक रचलेला आविष्कार आहे. त्याला अनेक पैलू आहेत. पण त्यात एक सामान्य जनतेतला, सत्तेपासून दूर असलेला माणूस-पुरूष हा एक अविभाज्य भाग असतो. मग डॉक्टर, पोलिस, साहित्यिक पुरस्कारांची निवड मंडळे, हे सर्व प्रतिष्ठित वर्गाचे प्रतिनिधी आहेत, ते कधीच आपल्या बाजूने असू शकत नाहीत, असे गृहीत धरून तो वागत असतो. तरी मी त्याला एक-दोन डॉक्टरांबरोबर अगदी वैशिष्ट्यपूर्ण नाते जोडलेलेही पाहिले आहे. दहा-बारा वर्षांपूर्वी त्याला हृदयविकार असल्याचे उघडकीस आले तेव्हा पाच-सहा महिने प्रयत्न करून अनेक वर्षांपासून असलेली सिगारेटची सवय त्याने पूर्णपणे सोडली. नंतर इसीजी, थ्री डी इको, स्ट्रेस टेस्ट आणि नियमितपणे गोळ्या घेणे या अनुभवाला त्याने आपलेसे केले.

स्वतःच्या 'इमेज'ची मोठी रचलेली इमारत नेहमीच पाठीवर बाळगून वावरणे अनेकदा कठीण होते. तुळसी आता कार्यकर्ता राहिला नाही, समाजात वावरण्याची एक स्वतंत्र सहजता वयाने, घरच्या जबाबदारीने, प्रकृतीने, जगात आणि समाजात झालेल्या बदलांनी, कालांतराने कमी केली आहे, याचा त्याला अजूनही त्रास होतो. याचा राग अनेकदा पत्नीवर उतरत असतोही. तरी तो त्याच्या पद्धतीने नवीन सामाजिक नाती जोडण्याचा प्रयत्न करत असतो. यात काही अडचणी येतात, त्या काही त्याच्या स्वभावातून आणि काही परिस्थितीतून निर्माण होतात. आमच्या दोघांशी जवळीक साधून मैत्री करणाऱ्यांची संख्या अगदीच कमी आहे. त्यामुळे सहजतेच्या सोशल लाइफवर मर्यादा येतात. मुंबईच्या महानगरी वातावरणात घडलेल्या या माणसाला औरंगाबादच्या समाजात समरस होण्यासाठी ज्या तडजोडी कराव्या लागल्या असत्या, त्या त्याने कधी केल्या नाहीत. आणि त्याचा नेहमीच काहीसा आक्रमक पवित्रा काही जणांना आकर्षित करत असला तरी बहुतेक जणांना स्वीकारायला कठीण जातो.

या अडचणींना काही जण एका 'आधुनिकतावादी' लेखकाच्या अडचणी म्हणून पाहू शकतील. महानगरी संवेदन विश्वाला श्रेष्ठ मानणे हा त्याचा हट्ट आहे. भौतिक स्तरावर त्याची स्वायत्तता महानगराच्या रस्त्यांना स्वैरपणे पायाखाली तुडविण्यात होते, तर मानसिक स्तरावर तो जगभराच्या कलाकार-लेखक-तत्त्वज्ञांशी परिचित असतो. ही स्वैरपणे फिरणारी व्यक्ती अट्टाहासाने पुरुषी असते. स्त्रियांचे स्थान त्याच्या या विश्वात एक तर लांबून रोमँटिक प्रेम करण्यासाठी, नाहीतर महानगरातील उपेक्षितांच्या जीवनाचे प्रतीक म्हणून वेश्येच्या रूपात अवतरते. ग्रामीण भागातील ऋतुचक्राची, शेतकऱ्याच्या जीवनाची त्याला फारशी ओळख नसते. आपल्या समाजातील धार्मिक परंपरा, रिती-रिवाज याची बरीच माहिती असली तरी त्यांच्याशी असलेले भावनिक नाते प्रामुख्याने संघर्षाचे असते. जाती-उपजातींमध्ये फारसा रस नसतो. आणि जातीच्या अस्मितेच्या राजकारणाविषयी टीकेची दृष्टी असते. हे सगळे वर्णन बऱ्याच प्रमाणात तुळसीला लागू होते. आजच्या बदलत्या सामाजिक-राजकीय परिस्थितीत अशा माणसाला कलाकार म्हणून टिकून राहताना वेगळ्याच प्रकारचा संघर्ष करावा लागतो. शिवाय तुळसीचा आज जगाशी येणारा संबंध नोकरी करणाऱ्याच्या किंवा कार्यकर्त्यांच्या नात्याने आपोआप जोडला जात नाही. जास्त करून कलाकार म्हणून किंवा कुटुंबातला पती, पिता म्हणून येतो. तो सहजासहजी स्वतःला बदलायला तयार होत नाही, म्हणून तो जवळच्या माणसांना अनेकदा ताठर वाटतो. त्याला अनेक वर्षांपासून पैसे कमवण्याच्या दृष्टीने तडजोड करावी लागली नाही, म्हणून व्यवहारातील अनेक गोष्टींबद्दल तो डोळे बंद करू शकतो. आपण रोजच्या जबाबदाऱ्यांमध्ये समतोल साधण्याची धडपड करत असतो तेव्हा त्याच्या प्रतिक्रिया कठोर आणि स्वतःसाठी 'प्रिव्हिलेज'चे स्थान जोपासणाऱ्या असतात.

मला असे वाटते की, तुळसीला या अस्तित्वासंबंधी गेल्या दोन-तीन वर्षांत एका 'क्रायसिस'मधून प्रवास करावा लागला आहे. सर्व काही अत्यंत तीव्रतेने जगण्याच्या त्याच्या अट्टाहासामुळे खूप कष्ट सोसावे लागले त्याला. काही काळ त्याचा मानसिक तोलही बिघडला होता. किंवा आजुबाजूच्या राजकीय वातावरणात मोठे बदल झाले आहेत. त्याच्या पिढीने क्रांतीची जी स्वप्ने पाहिली ती आता आधिकच दूर झाल्यासारखी वाटतात. एवढेच नव्हे तर भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी जी मूल्ये समाजात व्यापक अर्थाने स्वीकारली जात होती, त्यांच्यावर हल्ला होत आहे. फॅसिसिझम नकळत आपल्यामध्ये येऊन बसतो आहे. अशा वेळी साध्या माणसांच्या, बुद्धिजिवींच्या वागण्यात एक भित्रेपणा येतो. खरं बोलणाऱ्याबद्दलचा संशयीपणा वाढतो. पैसेवाले, प्रतिष्ठित, अधिकारप्राप्त असलेल्या मंडळींबद्दलची लाचार भावना वाढते.

अशा वातावरणात तुळसीसारखा माणूस जरा बावरून जातो. त्याचं सगळं खुल्लम-खुल्लं असतं. तो जरासा ताठरही असतो. अशा माणसाच्या जगण्यावरच आघात झाल्यासारखी परिस्थिती असते. अर्थात थोडासा सावरल्यानंतर तो या नवीन वास्तवाला पुन्हा आपल्या पद्धतीने सामोरा जातो.

असा माणूस जेव्हा बदल स्वीकारतो तेव्हा ती त्याच्यासाठी सोपी घटना नसते. पण ती वरवरची देखील नसते. केवळ आजची 'फॅशन' म्हणून तो आधुनिकोत्तरवादी कविता लिहिण्याच्या प्रयत्नात पडणार नाही. मात्र दुसऱ्या लेखकांनी केलेले प्रयोग समजून घ्यायला तो तयार असतोच. त्याचप्रमाणे त्याची बरी-वाईट प्रतिक्रिया अगदी स्पष्टपणे सांगून टाकतो. अशा वेळी प्रशंसा करायलाही कचरत नाही. माझा असा अनुभव आहे की, फारच कमी लोक असे वागतात. त्यामुळे अनेक तरुण, प्रतिष्ठित कवी, नाटककार, चित्रकारांना त्याचे खरे मत ऐकण्यात उत्सुकता असते. पण काही अपवादात्मक लेख सोडले तर टीका लिहिण्यात त्याने फारसा रस दाखवला नाही.

आमचे लग्न झाले तेव्हा तुळसी शहाद्याला श्रमिक संघटनेचे काम करीत होता. १९७८ साली त्याने शहादा सोडण्याचा निर्णय घेतला. कारण त्याला काही काळ वाचन व लिखाणावर लक्ष केंद्रित करायचे होते. मग १९७९ साली आम्ही औरंगाबादला आलो. तेव्हा तो काही दिवस लाल निशाण पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबर जमेल तितके काम करत होता. १९८१मध्ये ओजसचा जन्म झाला आणि मी नोकरी करत असल्यामुळे आणि कुणीही मदतीला नसल्यामुळे तुळसीने बाळाला सांभाळायचे कठीण कामही केले.

ओजस थोडा मोठा झाला तेव्हा तुळसीने औरंगाबादच्या 'अजिंठा' दैनिकामध्ये काही काळ नोकरीही केली. नोकरी पार्ट टाइम असली तरी रात्रीची ड्युटी करून वर्तमानपत्राचे पहिले पान जुळविण्याची सर्व जबाबदारी त्याला सांभाळावी लागायची. तेथून उशिरा घरी आल्यावर तुळसीला त्या दिवशी घडलेल्या गमती, उद्याच्या पेपरमध्ये येणाऱ्या बातम्या, यावर खूप बोलायचे असायचे. त्या दिवसात मीही लवकर झोपायचे आणि रात्री उठून, त्याला जेवण वाढून, त्याच्या सगळ्या गोष्टी ऐकून पुन्हा झोपण्याचा कार्यक्रम असे. या पेपरसाठी तुळसीने राजकारणातील तत्कालीन विषयांवर काही विशेष लेख अगदी आवडीने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने लिहिली. अर्थात, हे लेख आपल्या सृजनात्मक निर्मितीचा भाग होऊ शकत नाही, असे जाहीर करण्यासाठी तो 'ओज पर्व' या टोपण नावाने लिहीत असे. नंतर पगाराच्या बाबतीत फारच उशीर आणि टाळमटाळ होऊ लागली, तेव्हा तुळसीने ही नोकरी सोडून दिली. काही दिवस तुळसीने एका इंग्रजी वर्तमानपत्राचा औरंगाबादमधला बातमीदार म्हणूनही काम केले. तसेच एक-दोन वर्षं तुळसी मुंबईला राहिला, तेव्हा 'नवशक्ति' या दैनिकात त्याने काम केले होते. तर काही दिवस रात्रशाळेत शिक्षक म्हणूनही तो होता.

औरंगाबादेत तुळसीने शिकवण्या कराव्यात असा विषय आमच्यात मधून मधून निघायचा. तुळसीचे इंग्रजीचे वाचन चांगले आहे. गंभीर विषयांवर इंग्रजीत बऱ्याचदा मी त्याला मदत केली आहे. तासन् तास बोलताही येते. शाळा-कॉलेजात असताना त्याने वेळोवेळी परीक्षेत यश मिळवून सचिवालयातली नोकरी आणि त्यातील बढती पक्की केली. पण आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमाबद्दल त्याचे फारसे चांगले मत नाही आणि आता तर त्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून कुणाला शिकवणे खूप जड जाईल. एकदोन वेळा त्याने प्रयत्न केला, पण तो सोडून दिला. विद्यापीठ परिसरातील काही विद्यार्थ्यांशी त्याचा चांगला संवाद होतो. पण शिस्तबद्ध, अभ्यासक्रमबद्ध नाही. ली इलेसिंगर हे अमेरिकेतील संशोधक जेव्हा फुल ब्राईट स्कॉलर म्हणून औरंगाबादला राहिले तेव्हा त्यांनी आपली मराठी भाषेची जाण वाढविण्याच्या दृष्टीने काही टेक्स्ट वाचण्यासाठी तुळसीची नियमितपणे मदत घेतली.

आपण पैसे कमवत नाही म्हणून स्वतःवर कमीत कमी खर्च करावा ही शिस्त तुळसी पाळतो. त्यामुळे बस/शेअर रिक्षाने फिरायला त्याला आवडते. आणि पायीसुद्धा. हे करत  असताना शहरातल्या साध्या माणसांबरोबर गप्पा मारणे हा त्याचा खास छंद. खिशात काही पैसे असल्यास चोर बाजार किंवा फुटपाथवरून तो अगदी चोखंदळपणे कपडे, पुस्तके, चित्रे, मूर्ती मिळवण्यात पटाईत आहे आणि तेवढ्याच सहजजपणाने तो एखादवेळी ते आमच्या एखाद्या मित्राला-मैत्रिणीला देऊनही टाकतो. त्याच्या काही निवडक मित्रांनी आमचे लग्न झाल्यानंतरसुद्ध त्याला वेळोवेळी पैशाची मदत केली आहे. पण ते पैसे घेण्याचा त्याचा हेतू शान-शौकीचा नसून, एक स्वातंत्र्याची भावना राखण्याचा असतो. अधून-मधून दारू पिण्याचा शौक आहे, तीही चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या गप्पा होण्याची शक्यता असेल तर जरा जास्त प्रमाणात. पण दारू नाही मिळाली तरी फारसे वाईट वाटत नाही किंवा त्यासाठी धडपड करत नाही.

कुठल्याही जुन्या विवाहित जोडप्याप्रमाणे आमचा हा एकत्र केलेला प्रवास सुख-दुःखाचा, चढउतारांचा, प्रेमाचा, रागाचा, संघर्ष-समझोत्याचा झाला आहे. पण तुळसीबरोबर एखादा लहानमोठा प्रवास करायला मोठी ताकद आणि चिकाटी लागते. त्यामुळे मुले लहान असताना मी हे धाडस क्वचितच केले. यावर्षी आम्ही वर्षभर आजारपण, अपघात, मानसिक खळबळ याच्यातून गेल्यानंतर चौघांची आठ दिवसांची दक्षिणेकडची 'ट्रिप' निश्चित केली. दक्षिणेकडील काही स्थळे पाहून पॉण्डिचेरी गाठायचे ठरले. मग मी आणि ओजस मिळून प्रवासाचे वेळापत्रक, आरक्षण, खर्चाची आखणी केली आणि आम्ही निघालो. तुळसीचे या तपशिलाशी काही देणे-घेणे नसते. त्याची भूमिका असते, 'मी तर साधा माणूस आहे. मला काहीही चालते. तुम्ही ठरवा.' मग सगळे निर्णय आमच्यावर ढकलल्यानंतर तो टीका करायला मोकळा असतो. जे चांगले घडेल त्याचे 'क्रेडिट' घ्यायला मागेपुढे बघत नाही. 'बरं झालं तुम्ही माझं ऐकलं' या प्रकारचा आम्हाला तिघांना भरपूर वैताग येता येता आम्ही पॉण्डिचेरीला पोहचेपर्यंत तशी मजाही आली. मुलांनी तुळसीच्या या वागण्याला जोरदार विरोध करायला सुरुवात केली होती. मग एका हॉटेलच्या रूममध्ये अगदी लहान मुलासारखे, 'मग मी आता जातो' इथपर्यंत वेळ आली होती. नंतर मात्र समुद्राचे सान्निध्य आणि पॉण्डिचेरीचे आगळे वेगळे शांततेचे वातावरण यांनी आम्हाला घेरले. आम्ही विसावलो, आमचा सगळा ताण-थकवा निघून गेला.

परत आल्यानंतर तुळसीचे पुन्हा सुरू 'सुटी तशी बरी गेली, पण काहीकाही ठिकाणी नीट जेवायला मिळाले नाही. आणि शेवटी महाबलीपुरम राहिलेच.'

लिहिण्यासारखे तसे खूप आहे. तुळसीबरोबरच्या जीवनाला वेगवेगळे रंग आहेत. आमच्या दोघांच्या एकमेकांच्या कुटुंबियांशी झालेला संपर्क, देवाण-घेवाण, टकरी, प्रेमाचे संबंध या विषयाला मी हातच लावला नाही. आता मुलेही मोठी झाली आहेत. तुळसीचा हा अस्वस्थपणा टिकून राहील, त्याच्या सृजनशीलतेला येत्या वर्षात नवीन दिशा मिळतील आणि आमचे सहजीवन कसेही असले तरी त्यात नवीन काहीतरी घडत राहील, याची मला खात्री आहे.

Sunday, September 25, 2011

कुबडा नार्सिसस : मुखपृष्ठ : ब्लर्ब

कुबडा नार्सिसस हा तुळसी परब यांचा कवितासंग्रह लोकवाङ्मय गृहानं मे २००२ला प्रसिद्ध केला. त्याचं हे मुखपृष्ठ नि पाठीवरचा मजकूर अर्थात ब्लर्ब-

मुखपृष्ठ : सुधीर पटवर्धन
‘’FALL’’
1998
Acrylic on Canvas
60’’ x 42’’
Collection : Ravi & Virginia Akhoury, U.S.A.


मुखपृष्ठाविषयी...
फॉल : या चित्रामध्ये दूरवर दिसणारे दृश्य व जवळून दिसणारे दृश्य एकाच वेळी रंगवत असताना करावी लागणारी कसरत चांगल्या रितीने साधली आहे. दूरचे दृश्यही धूसन न भासवता स्पष्टपणे रंगवले आहे. पाठीमागचा डोंगर आणि त्याला जोडल्या जाणाऱ्या उभ्या-आडव्या बांबूच्या रेषा जणू चित्राला आधार देत आहेत. शहरात दाटीवाटीने वसलेली झोपडपट्टीवजा वस्ती दाखवताना, त्यातील बकालपणा चित्रकाराने वगळला आहे. विटांचे बांधकाम असलेली भिंत आणि एकाच ठश्याची पुनरावृत्ती करणाऱ्या टाईल्स जणू नक्षीकामाची शोभा निर्माण करतात. वस्तीतून वाहणाऱ्या नाल्याचे पाणीही निर्मळ दिसते. त्यात निळ्या आकाशाचे प्रतिबिंब पडले आहे.
ह्या सर्व पार्श्वभूमीवर टाईल्सचे काम करणारा कारागीर एका वाकलेल्या गैरसोयीच्या अवस्थेमध्ये स्थिरावला आहे. जणू तो पडता-पडता स्वतःला सावरतो आहे. ह्या प्रतिमेच्या विरोधाभासात आशावादाचे, उभारीचे प्रतीक भासणारा मैना मान उंच करून गाणे गात आहे.
***

तुळसी परब यांची कविता महानगरी संवेदनेचा एक विशेष असा विस्तार आहे. अरुण कोलटकर आणि मनोहर ओक यांच्या कवितेत सर्वव्यापी ठरलेल्या महानगरी जीवनाच्या संदर्भांची व्याप्ती त्यांच्या कवितेत खूपच मर्यादित झालेली दिसते. असे असूनही दिलीप चित्रे आणि सतीश काळसेकर यांच्या प्रमाणे महानगरी जीवनाचे संदर्भ अध्याहृत ठेवून ते त्यांच्यासारखी प्रतिसृष्टी निर्माण करत नाहीत. उलट महानगरी जीवनाचे वास्तव समंजसपणे स्वीकारून त्यातल्या ताणतणावाच्या आणि दबावांच्या सान्निध्यात आपले कविस्वप्न जागरूकपणे सांभाळतात. महानगरी संस्कृतीतील विनाशकारी भयावहतेला, कंटाळवाणेपणाला, अमानुषतेला फारसा उठाव न देता त्यातून आपली आत्मशोधाची वाट मोकळी करून घेतात. त्यांच्या कवितेतील स्थित्यंतराचे स्वरूपही सतीश काळसेकर आणि वसंत गुर्जर यांच्या कवितेतील स्थित्यंतरापेक्षा वेगळे आहे. त्यांच्या श्रेययात्रेला कविस्वप्नाबरोबरच सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील सक्रिय सहभागाचा साक्षात संदर्भ आहे. आत्मविघटनाच्या जाणिवेकडून सामाजिक विघटनाच्या जाणिवेकडे होणारी चंद्रकान्त पाटील यांच्या कवितेची वाटचाल आणि परब यांच्या कवितेतील स्थित्यंतर यांच्यात काहीसे साम्य जाणवते. पण त्यांच्यातील भेद अधिक महत्त्वाचा आहे. चंद्रकान्त पाटील यांच्या कवितेतील स्थित्यंतरात त्याचे आस्तिक्य इतक्या निखळपणे प्रकट होत नाही. उलट आधुनिक जाणिवांच्या विविध नकारातून तावून-सुलाखून निघालेल्या परब यांच्या कवितेतील ‘आस्तिकी सूर’ स्पष्ट होतो. तसेच गुंतागुंतीच्या राजकीय वास्तवाचे नेटके चित्रण करणाऱ्या त्यांच्या कवितेतील सूज्ञ आणि प्रगल्भ राजकीय जाणीव चांगल्या राजकीय कवितेची क्षीण परंपरा असलेल्या मराठी कवितेत विशेष मोलाची ठरते. समकालीन मराठी कवितेतील राजकीय जाणिवेची व्याप्ती वरचेवर वाढतच आहे. म्हणून अशा कवितेचे विश्लेषण आणि मूल्यमापन करताना परब यांची कविता एक संदर्भ चौकट म्हणून मोलाची ठरेल अशी आहे. कवीचे व्यक्तिगत स्वप्न आणि कार्यकर्त्यांची सामाजिक बांधिलकी अशा दुहेरी पेचातील जीवघेण्या ताणतणावातून आत्मशोधाची यात्रा चालू ठेवणारी त्यांची कविता सद्यःस्थितीत महत्त्वाची ठरावी अशी आहे.
- प्रकाश देशपांडे केजकर

Saturday, September 24, 2011

माझे आयुष्य माझे वाचन

- तुळसी परब

हे माझे आत्मचरित्र नव्हे किंवा मी काय काय वाचले याची जंत्रीही नव्हे.
माझ्या आयुष्यात घडलेल्या महत्त्वाच्या गोष्टींशी, माझ्या लिखाणाचा काही संबंध आहे काय किंवा मी वाचलेल्या काही गोष्टींशी माझ्या जीवनाचा काही संबंध आहे काय, हे पाहण्याचा हा एक प्रयत्न ठरावा.
मी एका गरीब कुटुंबात जन्मलो. माझ्या वडिलांची पहिलीच पिढी शहरात आली होती. आणि तत्कालीन कोकणातल्या लोकांप्रमाणेच माझे वडीलदेखील एका 'मील'मध्ये लिव्हींगच्या खात्यात कामाला होते.
आम्ही तत्कालीन महानगराच्या आखलेल्या पद्धतीप्रमाणे मध्य मुंबईतल्या एका चाळीत रहात होतो. चाळ संस्कृतीत शेजारीपाजारी एकमेकांशी अगदी मोकळेपणानं वागतात. सकाळी सगळ्यांना एकाच नळावर आंघोळ करायची असल्याने आणि दुसऱ्यांना दुसऱ्या नळावर पाणी भरायचे असल्यामुळे बायका पाणी भरीत आणि पुरुष त्यांच्यासमोर 'जय शंभो बंब' म्हणत कायम चट्टेरी पट्टेरी चड्डी घालून आंघोळी करीत.
घाटावरच्या लोकांना पहेलवानी प्रिय असल्यामुळे ते लंगोटावर आंघोळी करीत. आणि दांडपट्टा चालवल्यासारखे अंगाला साबण चोळीत. त्यांचा कितीही साबण आजूबाजूला उडाला तरी त्यांचे फारसे काही वाटत नसे. मात्र पिण्याच्या पाण्यावर आपले शिंतोडे उडू नयेत याची ते अगदी पूर्णपणे काळजी घेत.
मग प्रत्येकाला आंघोळ करून कामावर जायचे असल्याने शिस्त पाळण्याची सवय, सहकार्याची भावना अगदी तेव्हाही महत्त्वाची असल्याचे माझ्या मनावर बिंबले.
मी म्युनिसिपालिटीच्या शाळेत शिकलो. सातवीनंतर एका हायस्कूलमध्ये माझ्या वडिलांनी मला घातले. त्या काळातील पद्धतीप्रमाणे मी मॅट्रिकपर्यंतच तुला शिकवेन असे त्यांनी सांगितले. स्वतःच्या पायावर उभे राहायला शिका. अशी सामाजिक शिकवण त्यात अध्याहृत होती.
मला इंग्लिशची आवड म्युनिसिपालिटीतच जडली होती. मी शाळेचा बिल्ला लावायचो. त्याच्यावर काही के.एम.एस.सारखी अक्षरं होती. मी तेवढीच फक्त लक्षात ठेवली. नंतर आयुष्यात कधीतरी फार उशिरा कळले की त्याचा अर्थ क्षत्रिय मराठा समाजाशी होता. त्यानंतर आणखी काही काळाने कळले की आम्ही खरे तर कुणबी होते.
बरे झाले देवा     कुणबी केलो।
नाहीतर असतो    दंभे मेलो।।
याचा अर्थ आणि तुकाराम कळायला देखील मला एकंदर खूपच वर्षे लागली असे म्हणावे लागेल.
माझे वडील मात्र ही ओळ नेहमी घोळवायचे. आणि तसा कोकणातून आलेला हा माणूस मात्र बऱ्यापैकी शिकलेले असावा. कारण माझ्या आईचे वडील हेडमास्तर होते. हे त्यांनीच मला केव्हातरी सांगितले होते.
घाटावरच्या लोकांच्या गाळ्यात ज्ञानेश्वरी वाचली जायची. कधी भागवत लावायचे. कमाल म्हणजे माझे वडील हे समोर बसून ज्ञानेश्वरीचा अर्थ सांगत हे मी अगदी लहानपणी आईच्या मांडीवर डोके ठेवून ऐकत असे. त्यात आदराची भावना जशी असे तसेच वडिलांविषयीचे प्रेमही असे. पण मुख्य म्हणजे मी ऐकता ऐकता झोपी जाई. आणि मग अध्याय संपला की जय हरी विठ्ठल, जयजय विठ्ठल, जय जय राम कृष्ण हरी, अशा घोषणा दिल्या जात आणि वारीतल्यासारखे भजन सुरू होई. या भजनांचा अर्थ सर्वांना ठाऊक होता. ते अत्यंत तंद्रीत, एकात्म होऊन, भजने म्हणत हे मी पाहिलेले आहे. तुकाराम किंवा ज्ञानेश्वर हे त्यांचे परमदैवत होते, हे तर त्यांच्या लय, ठेक्यावरून आणि सतत तुकारामाचे अभंग सांगण्यावरून दिसून यायचे. तुकाराम त्यांना आवडत असे. आपण स्वतःच ती भजनं रचतोय असे त्यांना वाटे, कारण तुकारामाला कोणताच विषय वर्ज्य नाही. आपल्या अस्तित्त्वावर तो केंद्रस्थानी आहे याची जाणीव त्या भोळ्याभाबड्या लोकांनाही होती. आधुनिक मराठी कवितेला ही परंपरा कळायला खूप उशीर झाला.
आधी आपल्याला आपल्या परंपरा ठाऊक हव्यात. त्यातलं बरं-वाईट, श्रद्धा-अंधश्रद्धा कळायलाही हव्यात. मौखिक परंपरा प्रामुख्यानं हे कार्य पार पाडत असतात. पण आधुनिक जीवनाचा स्पर्श झाल्याशिवाय, जीवनातल्या तातडीशिवाय, भौतिक जीवनातल्या धावपळीशिवाय आणि एका विशिष्ट पातळीपर्यंत अक्षरओळख होऊन खऱ्या साक्षरतेकडे आपण वळल्याशिवाय आपण त्यांना खरोखर अर्थ देऊ शकत नाही हेही तेवढेच खरे.
म्हणून साक्षरतेच्या परंपरेनुसार, गाणी, मेळे, भजने, कामागारवर्गीय नाटके, तत्कालीन दिवाळी, होळी हे सण, या सर्वांचा माझ्या अबोध जाणिवेवर आणि माझ्या लिखाणावर कुठेतरी नकळत, अगदी खोलवर परिणाम झाला असणार हेही मी तुम्हाला सांगू शकतो.
एव्हाना मी कॉलेजमध्ये जायला लागलोय. मला दाढी मिसरूड फुटलीय आणि जीवनाच्या नव्या टप्प्यावर आलोय याची जाणीव मला झाली. इथेही तेव्हा सामूहिक जीवन होते. स्त्री-पुरुष, एकत्र जीवन पद्धती, आनंद देण्याघेण्याची तऱ्हा, या गोष्टी होत्या, एकमेकांशी उघड उघड प्रेम करण्याची आणि ते सांगण्याची हिंमत होती. हे मला आजूबाजूला पाहून कळायला लागले. मीही त्यात सामील होतो.
एका श्रमिकाचा मुलगा असल्याने, आधी कधीतरी, 'मला वाटते गाढव व्हावे' अशी कवितेची एक ओळ लिहिल्याचे मला स्मरते. नंतर श्रमातून ही जाणीव विकसित होऊन प्रेमावर आली होती. हायस्कूलात प्रेमकविता वाचल्या होत्या, त्यापेक्षाही चांगल्या कविता लिहाव्यात असे मला वाटले होते.
मी त्यानंतर बऱ्याच प्रेमकविता लिहिल्या, नंतर त्या फाडूनही टाकल्या.
कॉलेजात मी अर्धवेळ शिक्षण घेत होतो. मराठी आणि संस्कृत. संस्कृतचे भय वाटे. गीतेचा एखादा अध्याय, मेघदूताचे कालिदास इतर काही संस्कृत व्याकरण याच्या पलीकडे मी जाऊ शकलो नाही. संस्कृतची भीती हा माझ्यावर सामाजिकदृष्ट्या झालेला मोठा अन्याय होता. तो काढण्यासाठी माझ्या कॉलेजमधील सरांनी मला वि. का. राजवाडेंचा धातुकोश आणि नामधातुकोश वाचायला सांगितले.
त्या दोन ग्रंथांनी आणि फारशी मराठी कोशांनी माझ्यावर आणि माझ्या जाणिवांवर खूप मोठा प्रभाव पाडला. भाषा म्हणजे संस्कृतीची किती विविध आणि विलक्षण समंजस जुळणी असते हे तेव्हा मला कळायला लागले तेव्हा मला छंदोबद्धता, नाद, लय, मुक्तलय या सर्वांविषयी कळायला लागले. आधीपासूनच्या मराठी कवितेने दिलेल्या भाषेवर मी सुरू केलेला संस्काराचा तोही एक भाग होताच.
आतापर्यंत आपण १९६० ते ६५ च्या काळापर्यंत आलो. खूप वाचन झालं. मी पाब्लो नेरूदा वाचला. 'अमेरिका' एका फटक्यात वाचून काढली; परंतु 'ट्रायल'ला मी पुढे जाऊ शकलो नाही. कारण 'ट्रायल' मलाच 'फेस' करायचा होता. डोस्टोव्हस्कीचीसुद्धा मला कादंबरी वाचता आली नाही. मी जी. ए. कुलकर्णीपर्यंतच अडकलो आहे. मराठीतले नंतरच्या काळातील आधुनिक लोक मी वाचलेले आहेत. तुम्ही म्हणाल की तुम्ही अमूक नाटक पाह्यलंय का? तर हो. मी 'सूर्य पाहिलेला माणूस' पाहिलेलं आहे. मी रेहमानची गाणी ऐकलीत. जयदेव मला माहिती आहे. हे सगळं मला माहिती आहे आणि हा सगळा आपल्या संस्कृतीचा भागच असतो. आता हे जर तुम्ही करत नसाल, त्यांना वेगवेगळ्या पातळ्यांवर कुठेतरी- आपल्या सांस्कृतिक विश्वात सामावून घेत नसाल, लोकांना, की जे खरंच उत्सुक आहेत, आणि मग वाचन संस्कृती पसरवण्याची जर भाषा आपण करत असू तर ती करावी. आम्ही एकदा कार्यकर्ता म्हणून कार्य केले आहे. परत एकदा वाचन संस्कृती पसरवण्याचं कार्यदेखील करू. ते कार्य खरंतर मी माझ्या कवितांमधून चालूच ठेवलेलं आहे. ते किती लोकांपर्यंत पसरलंय ते कालच्या कवितेला मिळालेल्या प्रतिसादावरून आपल्या लक्षात आलेलंच आहे. एक प्राध्यापक बोलता बोलता म्हणाले की, 'अहो, काय ते अरुण कोलटकर, आणि ही मंडळी यांनी काय कविता लिहिल्यात.' आता तुमच्या मराठी भाषेचं नशीबच असं की बिचारा अरुण कोलटकर मरूनसुद्धा गेला.
अरुणची एक गोष्ट सांगतो आणि मग मराठी कवितेचं काय दिवाळं काढायचं ते तुम्ही काढा. हा अरुण कोलटकर, हा माणूस ज्याने कविता लिहिली तेव्हा त्याला 'कॉमनवेल्थ'चा पुरस्कार मिळाला. मराठी लोकांना तो माहीतसुद्धा नाही. आणि काल एक प्रोफेसर म्हणत होते की अरुण कोलटकर आणि चित्रे ठराविक लोकांसाठी लिहितात आणि बाकीचे 'फिक्शन' लिहिणारे कुणासाठी लिहितात? आणि नाटक लिहिणारे कुणासाठी लिहितात? त्यांनी काय, अरुण कोलटकरांनी लिहिलंय? मग विश्वात ते अमूक कवी आहेत. पण मग अरुण कोलटकरनं नंतर काय लिहिलंय हे तुम्ही वाचलंय का? आत्ता काय लिहिलंय? त्याने कुठल्या पद्धतीने एक मेळा संबंध वारकऱ्यांचा कुठे चाललाय, कसा चाललाय हे तुम्ही वाचलंत? नाही. तर अरुण कोलटकर विषयीची शेवटची गोष्ट सांगून मी माझं कवीच्या चारित्र्याविषयीचं विवेचन थांबवतो.
अरुण कोलटकर आजारी पडला. त्याला कॅन्सर झाला होता. ते त्याला डॉक्टरनं सांगितलं. आणि तो टर्मिनल कॅन्सर होता, हे जेव्हा त्याला सांगितलं तेव्हा त्यानं अशी औषधं उचलली आणि खिडकीतून बाहेर फेकून दिली. अरुण म्हणाला मला टर्मिनल कॅन्सर झालाय तर मला माझ्या वेदना सहन करायला पाहिजेत. मी कवी आहे. मी त्या वेदना सहन करीन. त्यानं ती औषधं बाहेर फेकून दिली आणि तो रोज जसं आयुष्य जगायचा, बसमधनं जायचा, मित्रांना भेटायचा, भावाकडे जायचा. तसा अरुण त्याच्या भावाकडे गेला होता आणि भावाकडनं परत येताना बसमधे कोसळला. कवीच्या कार्याविषयी बोललेलं, मला वाटतं मराठीतल्या एका महान कवीविषयीचं हे विवेचन त्याच्या स्मृतीला वंदन करून मी थांबवतो.
***
'वाचनवेध' या पुस्तकातून हा लेख घेतलाय. हे पुस्तक या ब्लॉगपर्यंत चंद्रकान्त पाटील यांच्यामुळे आलं.

भूमिका

'पुन्हा एकदा कविता' ह्या ना. धों. महानोर व चंद्रकान्त पाटील यांनी संपादित केलेल्या पुस्तकातला मजकूर

स्वतःच्या कवितेविषयीच्या भूमिकेबाबत १९७५मध्ये तुळशी परब यांनी अनिल बांदेकरांना लिहून दिलेल्या विस्तृत पत्राचा हिंदी अनुवाद 'आवेग : २१'मध्ये प्रकाशित झाला होता. खालचा उतारा त्यातून घेतला आहे.

'..... बदलत्या वास्तवात गतिशीलता बघण्याचा प्रयत्न याच काळातला.
पण वास्तवात अनेक गोष्टी असतात. आपलं वय असतं.
संवेदनशीलता असते. बाहेरचं जग असतं आणि सगळ्याहून थोर असे आपले दोस्त असतात. त्या सगळ्यांसोबतच आपण काही समजून घेत असतो.... या सगळ्यांतून आत्मविश्वास मिळवण्यासाठी आणि बाहेरच्या जगाचं आकलन करून घ्यावं म्हणून मी एका वेगळ्याच भाषेच्या शोधात होतो.... आम्ही सगळ्यांनी मिळून साहित्यातल्या जुन्या गोष्टी, रोमँटिक अंधश्रद्धा, जगण्यापासून पाठ फिरवण्याचा भित्रेपणा कायमचा फेकून देण्याचा प्रयत्न केला.... एकाकी लढणं अशक्य होतं. चुकीचंही. लक्षात आलं की लढायचं असेल तर राजकारणाशिवाय अशक्य आहे. मग कवितेवर प्रेम करणारे लोक हळूहळू वास्तवातील जगण्यावर प्रेम करू लागले. आपलं सामूहिक जीवन समजून-उमगून घेण्याच्या आणि ते बदलण्याच्या प्रयत्नात लागले.... जीवनावरचं प्रेम वाढत गेलं. आधी नुस्तंच कविता लिहिणं होतं, आता कवितेतून लोकांकडं आणि लोकांकडून कवितेकडं असा एक अखंड प्रवास सुरू झाला.....'

Friday, September 23, 2011

दोन व्हिडियो

तुळसी परब यांनी त्यांच्या दोन कविता नांदेडमधल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात वाचल्या होत्या. त्याचे हे दोन व्हिडियो--

 



डबक चाळ : आधीच प्रभुत्वाशयाने

डबक चाळ : आधीच प्रभुत्वाशयाने मग्न
महारांच्या भाषेतला अतिथी शब्द होतो
सामान्य व्यवहारातला
आणि समोरच्या डबक्ताय एक साग्र
रंगीत चाळ उभी रहाते.
ती कलंडतेही कधी कधी आणि सोप्या बदकासारखी,
चिखलासारखी, डबक्यात पडता पडता
तिचा भुरकट पांढरा रंग विस्तारतो.

ती डुबते, ती डबाडबा घाईने डुबते,
तिची चिल्लीपिल्ली आंघोळतात, तिच्या मग्न आशयाला
कोऱ्या भाकरीएवढे साधे नव्हे
तर उपासाच्या धोपडदशमीसारखे कंगोरे फुटतात.

डबक चाळ की बदक चाळ, आम्हाला हा प्रश्न पडायचा
नावाची गल्लत करायचो आम्ही ल्हाणपणी,
मी गटारावरून म्युनिसिपाल्टीच्या शाळेत जायचो,
पावसाळ्यात पाणी फुगले की
पोरं धडाधडा उड्या घ्यायची
घाण पाण्याने त्यांचे डोळे, केस हिरवे व्हायचे
मी पण हिरवे टोळ पकडायचो
हिरवी हिरवी फुलपाखरे होतो आम्ही
आम्ही मुले पण असायचो, पण हिरवी नी कच्ची

मीही एकदा पाण्यात उडी घेतलेली गटाराच्या
नी पोहत गेलेलो डबक/बदक चाळीच्या ओसाडीपर्यंत

भीमराव ल्हाणपणी इथे रहायचे, त्यांनासुद्धा
पावसाळ्यात घाणीतून पोहत यावे लागायचे, माहित हे
भीमराव कोण, कुठल्या यत्तेतला मी विचारले
आमच्या शाळेतला खैरमोडे म्हणाला,
अरे भीमराव म्हणजे आपले बाबासाहेब
आपले डाक्टर बाबासाहेब आंबेडकर,
आंबेडकर बाबा.
आपल्या पुस्तकात ज्यांचा फोटो आहे ना ते.
आणि त्या बिचाऱ्याकडे पुस्तक नव्हते
माझ्याकडेसुद्धा तेव्हा थोडीच पुस्तके होती.

बाबासाहेब, पहिल्यांदा तुम्हाला
असे ओळखले आहे मी, असे
ल्हाण अस्ताव्यस्त हिंडणाऱ्या चिखली डुकरासारखा,
आपल्याच संकटामधून जगासमोर
संकटाची मीमांसा मांडणारा,
या जगाच्या जातीव्यवस्थेला डुक्कर-मुसंडी देऊन
तो डबक/बदक चाळीच्या गटारात
कोसळून देऊ इच्छिणारा
एक सालस, कंदिलाच्या उजेडातला
तोकडी खाकी पँट घालणारा कवि-पोरगा.

बाबासाहेब लहानपणी तुम्ही डिट्टो असे दिसला होतात मला
मी सातवीत असताना,
आणि बाबासाहेब, तुम्हाला आठवते ना
तुम्ही लहानपणी आमच्या पुस्तकातसुद्धा राहत नव्हतात
नी डबक/बदक चाळीपेक्षा तुमची कांक्षा विस्तारून,
तेव्हा कितीतरी प्रचंड वर्षे होऊन गेली होती.

मी केवढा होतो, तुम्ही कुठे केवळे १९५३ साली
आम्ही पाचव्या यत्तेत असताना बाबासाहेब,
आणि सातवी संपवून
मी गटाराजवळच्या शाळेतून हायस्कूलात गेलो
तेव्हा तुम्ही काय करत होतात.

तुमचं धर्मांतर झालं होतं का तेव्हा,
धर्मचक्र प्रवर्तनाचं वहातं वारं
गटारं बुझवू पाह्यलेली तुमच्या शांत समुद्राने
एक प्रचंड आंदोलित इतिहास घडवलेला तुम्ही
ते घडलं होतं का तेव्हा,
तुम्ही नव्हतात आणि होतातही वाटते अंधुकसे
जेव्हा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत
आम्ही सर्व जातीपातीची पोरं
शाळेत जात असताना
आजूबाजूने सूं सूं गोळ्या चालत असत,

अनेकदा खाटेवरून नेताना
जखमी किंवा मेलेली माणसं
तुम्हीही पाहिलेली असतील, बाबासाहेब
तेव्हा कर्फ्यूच्या ठिक्कर अंधारात

बाबासाहेब ल्हाणपणी किती एकाकी वाटायचं
गटारावरच्या पोरांना तेव्हा, किती एकाकी.

पाणी : निळेभोर । काळे । सावळे


पाणी : निळेभोर
काळे
     सावळे
          दाटत जाणारे
डोळ्यातल्या पाण्यासारखे
बंदिस्त
     वहाते
ज्यातून हांकाच हांका ऐकू येतात
जुन्या नी घुसमटल्या सारख्या,
पाण्याच्या पातळ्याच पातळ्या दिसतात
     चौथ्यांदाही
     निव्वळ सगळ्या चारच.
पाणी वरचे वरचे
शुभ्र
     चंदेरी रंगाचे
नी पाणी जणू वहातीचे खालचे
म्हणजे दुसरीच जात
          केवळ समजूतदार
गटारासारखी, सर्व सामावून घेणारी
     घाण, गू, म्हैसींचा मळ
     अपरोक्ष शिव्या नी दुष्काळाचा
     दिवाळसण पिढ्यांनी नावाजलेला


पाण्याच्या पिढ्यानपिढ्या नसतात
सरमिसळत सगळ्या वरच्या
          नी खालच्या
पातळ्या सोडून
     स्वतःहून
          स्वतःक्षेत्राहून
वाढीव आक्रमण विस्तारतं
शांततेच्या सगळ्या पायऱ्या घरंगळतात
नी पाणी चढू लागते चढू
          पु रा सा र खे
नी पाण्याची पायरी
          नी
               पायरी
                    कोसळते
पाण्याची हलकी दुर्भेद्य संघटना.


पिढी आहे पाण्याची आधी
की माणसाची जन्म आहे
माणसाचा
की पाण्याच्या आधी
               माणुसकीचा.
जन्म : मरताना रामरक्ष
               पाणी मागणारा
जन्म विभागलेला माणूसपणापेक्षा
कोण कसले पाणी पितो
               यावरून
जन्म –
               जन्मापासूनच
पाण्यातूनही खोटं आक्रमण
शिरतय आपल्यात
नी आपण दुभंगतोय
प्रौढ मतदार संघात.
आधी मिळवलेलं आपलं
प्रत्येक विशेषण
               विरघळून चाललेय
पाण्यात नी फक्त
लिटरचा हक्क
               मिटरचा हक्क
               पाण्याचा हक्क
संपूर्ण सुसंवाद समजूतदारपणाचाही हक्क


जसा नेहमीचाच समजूतदारपणा पाणी दाखवतं
गटारीतून समुद्रात जाऊन मिळण्याचा
तसा
समजूतदारपणा आपणही दाखवतो
संस्कृतीतून विनाशात जाऊन मिळण्याचा.
खालचं पाणी सोज्वळ-साजरं
               वस्तुगत
सहन करते सगळा समूह
नी विझल्या दिव्यागत
खुंटीला टांगते सगळा अर्क
सगळा इसेन्स
               पाण्याचा
या पाण्याची आठवण झाली
प्रतिष्ठ जीवनात
               की कोंदण
सगळं हालतं
          नी भेसळीची लूट
सगळी कोसळत सावरतं


पाणी सावरतं
          सगळंच
पाणी हुकूमाची तामिली
करणारं
पाणी प्रेतावरनं वहाणारं
पाण्याचं अंतरंग नसतंच
माणसासारखं
          माणसाएवढं
किंबहूना सालस.
          पाणी निमूट
          अंदाजासारखं
वाखाणतं आलेले सगळे हुकूम
पाणी असतं ताबेदार
असमान पातळ्यांवर
पण अधिकाचा
           स्वीकार स्वीकारत
पुढची पिढी करते साष्टांग नमस्कार
पुढची पिढी घेते पोझ
आक्रमणाच्या संकटासमोर
शुष्क
          दुष्काळी
               पुराची.


पुराविरुद्ध पोहायचं
की आक्रमणाचं संकट डोक्यावर ठेवायचं
मतभेद विसरायचा
          एकोपा करायचा
की बंधुभावाच्या घोषणांतून
धर्मयुद्ध वाढवायचं


पशुमध्येसुद्धा पाणी सम
               तोल
               राखतं
प्रदेशासारखं पाणी निळं हिरवं
ढग-आकाश जंगल-प्रकाश
व्यापतं
पाणी अंतर वाढवतं
डोळ्यातल्या पाण्यापासूनचे
हृदयातल्या पाण्यापर्यंत
नी त्या पाण्यापासूनचे
परत मानवी पाण्यापर्यंत.
पिढ्यानपिढ्या शक्तीचा अंदाज घेता घेता
रक्ताचं कारंज उफाळतं
पाण्याच्या प्रदीर्घ झऱ्यामधनं
पण पाण्याचा विधी होतो
प्राण्याच्या बळीसारखा
नी पाण्याची झुंड करत नाही
कुठल्याही पिढीला
          इतिहासातून
कायमची बरबाद.


पाणी मिळाले कधी उन्हातून आलेल्याला
नमस्कार केला देणाऱ्याला
म्हणजे कसला असतोय तो विधी.
ती एक जीवघेणी शपथच असते ना
दलिताची
          माझ्या हाती शस्त्र नाही
मी तुम्हाला शरण आलोय पाण्यासाठी
याची.
आई मुलाला पाजते
नी त्याचा आक्रमकपणा थांबवते
स्तनजन्य
          निराशा साकळते
मुलाच्या डोळ्यात.
प्रेमाचा अधिकार
पाडतो त्याच्यावर
          जीवनव्यापी सावली
नी त्याची भावली
नियमित व्याकुळवून टाकणारी
निचरा करणारी
मानते
          अधिकाराच्या गोष्टी
पाण्याच्या चपखल पातळ्या
               नी समष्टी.


समष्टी
          सगळी कष्टीय :
हे सगळे पाण्याच्या पापाचे पाढे
मी वाचता वाचताच निग्रह
          विख्यात होत जातोय.
मी तुम्हाला सांगतोय
ती सगळी पाण्याची हकिगत नाही
ही हकिगत आहे
पातळ्यांवर
जगणाऱ्या दुर्दम्य माणसांची
ही एक प्रच्छन्न व्यथा आहे
नी नुक्ती नुक्ती मिटत चालली आहे
ती संपतेय खाणीतल्या हरताळात
ती हेलावतेय वरळीच्या बहिष्कारात
ती चाचपडतेय नक्सलबाडीच्या उठावात
ती हकीगत आहे
व्याकुळता सोडून सुदृढपणे जगाकडे पहाणारी
ती नाही एक संतत निराशा
ती आहे घाणीचे घमेले
फेकून दिलेले          वरपर्यंत
          खालनं
ती आहे काळाची
               संपृक्त गरज.
नी पाणी मावळतेय हळूहळू
                    शरणांगत.
पाण्याच्या समजूतदारपणातच्या पातळ्या
आताशा मोजता
     येणार नाहीयेत
हळूहळू
     आताशा जळतेय पाणीसुद्धा
हळूहळू
     जाळतेय पाणी सगळं
ज्याला ज्याला वेढून
     पूर्वी ते वहात
          रहात होतं.

मी एक कुबडा नार्सिसस


मी एक कुबडा नार्सिसस आहे, कुबडा
बहुप्रसव शेवाळासारखा पण लंगडा
मला माझ्यापास्नं पळून जाता येत नाही
नी डोंगर माझे : पाठीवरचे ओबध धोबड
नी नद्या माझ्या आतड्यातल्या कढतील ते कढ

तुझ्या आकांताच्या एकांतात
मी तुला मधाचे बोट लावीत नाही,
खुशाल दिव्य सुंदरीही म्हणत नाही,
आरसा काजळतो तेव्हा कोसळतात लक्षावधी
नी तुझ्या असण्याच्या स्वातंत्र्यात उगवतात अवधी.

तिथे तू तुझी असतेस, तिथं कुबड असतं साधं
पायांच्या अष्टकोनाचं बळ तसं एरवीचंच लब्ध
नी तुझेही डोंगर, तुझ्याही नद्या
यांची सरमिसळ होता होता
दोघांवर उगवते सोपं असण्याची सामुद्रिकता

आपापल्या अर्थातून विश्ववास्तव घडवावं, जशा लाटा
तू तुझं नी नी माझं, तरी मनातून पूर्ण कोमेजलेला
नार्सिसस नी त्याचं शेवाळातनं घसरणं
ती त्याचं रडणं, त्याचं मोकणं

दोघांना वाटतेय हे खूप खोटं
खूप खूप खोटं

Thursday, September 22, 2011

तुळसी परब यांच्याबद्दल अच्युत गोडबोले

अच्युत गोडबोले यांचं 'मुसाफिर' हे आत्मचरित्र 'मनोविकास प्रकाशना'ने प्रकाशित केलं आहे. यात १९६०च्या दशकातल्या घडामोडींसंबंधी आलेला तुळसी परब यांचा उल्लेख इथे नोंदवून ठेवतोय. काही संदर्भ स्पष्ट होण्यापुरतीच ही नोंद.

पुस्तकातल्या 'आयआयटी' या दुसऱ्या भागामधला एक उपभाग आहे 'डावी वळणं'; त्यामध्ये तुळसी परब यांच्याबद्दल लिहिलेला परिच्छेद -


याच काळात तुळसी परब याच्याशी माझी ओळख झाली. सयानी रोडला कामगार वस्तीत वाढलेला तुळसी परब हा लघुनियतकालिकांच्या चळवळीतला एक ठळक कवी होता. 'हिल्लोळ' हा त्याचा पहिला कवितासंग्रह 'वाचा' प्रकाशनानं काढला. तुळसीनं लिंग्विस्टिक्समधे एम.ए. केलं होतं. तुळसीची शब्दांवर असलेली पकड त्याच्या कवितेतून दिसायची. कीर्ती कॉलेजमध्ये शिकताना जवळच्या समुद्रानं त्याला वेड लावलं होतं. समुद्राची प्रतिमा वेगवेगळ्या रूपात त्याच्या कवितेत सतत डोकावे. समुद्र आणि तुळसी यांची अतूट दोस्ती असल्यामुळे समुद्रावर भटकणं हा त्याचा एक अटळ छंद बनला होता. तुळसीनं थोडा काळ सचिवालयात नोकरी केली. पण तिथे त्याचं मन रमलं नाही. नोकरी सोडून भणंग आयुष्य जगणं त्यानं पसंत केलं. त्याची कविता व्यक्तिवादी नसून सामाजिक भान ठेवणारी होती. त्यामुळे प्रस्थापितांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या लघुनियतकालिकांच्या चळवळीत त्यानं पुढाकार घेतला.
(पान क्रमांक १८०-१८१)

यानंतर 'चळवळ आणि विषण्णता' या तिसऱ्या भागातल्या 'आदिवासी चळवळ' या पहिल्या उपभागातला मजकूर असा आहे-

शहादा चळवळीतला एक खंदा कवी कार्यकर्ता म्हणजे तुळसी परब होता. तुळसी परब माझा मुंबईपासूनचा एक अवलिया बंडखोर कविमित्र होता. लिटल मॅगझिन्सच्या काळापासून तो प्रस्थापितांविरुद्ध कविता लिहीत आला होता. तो आणि मी एकत्र शहाद्याला कधीच नसलो तरी शहादा चळवळ म्हटली की त्याचं नाव घ्यावं लागतंच. एके दिवशी मुंबई सोडून थेट शहाद्याला आदिवासी चळवळीत तो सामील झाला आणि नंतर अनेक वर्षं शहाद्याला राहिला. एकदा श्रीमंत शेतकऱ्यांनी तुळसीवर केलेल्या प्राणघाती हल्ल्यातून तुळसी जरी बचावला तरी त्या हल्ल्यात त्याचा एक हात जायबंदी झाला. कित्येक महिने केईएम हॉस्पिटलमध्ये काढल्यावर त्यानंतर आयुष्यभर एका हातात सळई घालूनच त्याला वावरावं लागलं. या सगळ्या प्रसंगावर त्यानं 'कवी, कविता आणि कुऱ्हाड' अशी सुंदर कविताही लिहिली. यानंतरही नाउमेद न होता त्यानं काम चालूच ठेवलं. तेवढ्यात आणीबाणी घोषित झाली आणि १९७५ साली आणीबाणीविरुद्ध बोलल्यामुळे त्याला पोलिसांनी अटक करून विसापूर जेलमधे पाठवलं.
(पान क्रमांक २०४-२०५)

कवीच्या मोठेपणाच्या खुणा

- जयंत पवार

(९ ऑगस्ट २००३ रोजी महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेला लेख. परबांच्या 'कुबडा नार्सिसस'च्या संदर्भात)

सुमारे २५ वर्षांचा पैस असलेल्या या कवितासंग्रहात या दरम्यान कवीने पाहिलेल्या, साहिलेल्या आणि त्याच्या व्यक्तिगत जीवनाबरोबर अंतरंगात घडलेल्या बदलांची, स्थित्यंतरांची आणि बारीकशा स्पंदनांचीही नोंद यात उमटलेली आहे. तो जगला, जगतो आहे तो काळ आणि त्याचा भवताल 'कुबडा नार्सिसस'च्या रूपाने आपल्याला भेटतो.

साठोत्तरी पिढीतल्या गवगवा झालेल्या कवींच्यामधून दोन नि:संशय मोठ्या ठरणाऱ्या कवींची नावं सतत मागे राहिली. त्यातलं एक नाव म्हणजे मनोहर ओक आणि दुसरं तुळसी परब. योगायोग म्हणजे दोघंही एकमेकांचे सुहृद आणि सदोदित मराठी कवितेच्या आडव्यात जाणारे. (या दोघांचे तिसरे साथीदार नामदेव ढसाळ, जे थोर ठरलेच; पण या तिघांच्याही प्रभावळी एकमेकांवर पडत राहिल्या.) आज मनोहर ओक हयात नाहीत. आणि तुळसी परबांचा 'हिल्लोळ' आणि 'धादांत आणि सुप्रमेय्य मधल्या मधल्या मधल्या कविता' या दोन कविता संग्रहांनंतरचा 'कुबडा नासिर्सस' हा तिसरा संग्रह तब्बल पंचवीसेक वर्षांनी प्रसिद्ध झालाय. तुळसी परब यांच्या कवी म्हणून असलेल्या मोठेपणाच्या खुणा या संग्रहात मुबलक सापडतात.

एकूण ७१ कवितांचा समावेश असलेल्या या संग्रहाचा पैस मोठा आहे. २५ वर्षांचा काळ यात सामावलेला आहे आणि या दरम्यान कवीने पाहिलेल्या, साहिलेल्या आणि त्याच्या व्यक्तिगत जीवनाबरोबर अंतरंगात घडलेल्या बदलांची, स्थित्यंतरांची आणि बारीकशा स्पंदनांचीही नोंद यात उमटलेली आहे. एका अर्थाने हे कवीचं चरित्र आहे. तो जगला, जगतो आहे तो काळ आणि त्याचा भवताल 'कुबडा नासिर्सस' च्या रूपाने आपल्याला भेटतो.

यातही चार ठळक भाग आणि त्यांच्या आत काही उपभाग (पाडले नसले तरी) आपल्याला स्पष्टपणे दिसतात. त्यांच्याकडे कवीच्या आयुष्यातली वळणं म्हणूनही पाहता येऊ शकतं. सुरुवातीचा भाग हा समाजपरिवर्तनाच्या लढ्यात धुळे-शहाद्यात आदिवासींच्या हक्कांसाठी लढताना जगलेल्या क्षणांचा, तुरुंगातील आठवणींचा, तिथल्या माणसांच्या जगण्याबद्दलच्या समजुतींचा उत्स्फूर्त उद्गार आहे. अगदी पहिल्याच, पाण्यावरच्या कवितेत तुळसी परब प्रतीकात्मक मांडणी करीत भेदक राजकीय भाष्य करतात. त्यांची जात आणि वर्गजाणीव इथे तल्लखपणे प्रकटते. याच्या पुढचा भाग हा 'आता हे कुरूप काढून खूप लांब दौडावसं वाटतंय' या जाणिवेचा आहे. आयुष्यातलं प्रेयस गवसल्यावर थोडा निवांतपणा मिळवण्याचा कवीचा प्रयत्न आहे, पण त्याला आपला संघर्षमय भूतकाळ विसरता येत नाही. आपली दुर्दम्य इच्छाशक्ती आणि वाट्याला आलेले नकार, पराभूतता यांच्यासह तो हे नवं आयुष्य स्वीकारू बघतो आहे आणि अविस्मृतीच्या पाशात स्वत:शीच झुंजत घायाळ होतो आहे. तो म्हणतो :

मी एक कुबडा नार्सिसस आहे , कुबडा
बहुप्रसव शेवाळासारखा पण लंगडा
मला माझ्यापास्नं पळून जाता येत नाही
नी डोंगर माझे : पाठीवरचे ओबड धोबड
नी नद्या माझ्या आतड्यातल्या कढतील ते कढ
तुझ्या आकांताच्या एकांतात
मी तुला मधाचे बोट लावीत नाही...

या भागात आईविषयीच्या कवितेचा आणि 'डबक चाळी'चा एक नॉस्टॅल्जिक उपविभाग आहे आणि दुसरा उपविभाग आहे तो मुलांविषयीच्या कवितांचा. 'डबक चाळी'चं वर्णन कवी करतो:

ती डुबते, ती डबाडबा घाईने डुबते,
तिची चिल्लीपिल्ली आंघोळतात, तिच्या मग्न आशयाला
कोऱ्या भाकरीएवढे साधे नव्हे
तर उपासाच्या धोबडदशमीसारखे कंगोरे फुटतात.

या डबक चाळीशी बालपणातल्या आठवणी जोडून घेताना बाबासाहेब आंबेडकरांचं बालपणही इथेच गेलं याची याद देत बाबासाहेबांच्या पुस्तकातून झालेल्या पहिल्या ओळखीशी आठवणींचे बंध जोडत कवी कवितेचा परीघ कसा मोठा करत नेतो आणि एका नाजूक हळव्या नोटवर कविता आणून ठेवतो, ते पाहण्यासारखं आहे.

तिसरा टप्पा हा परब यांनी आपल्या सुहृदांविषयी आणि आदरणीय व्यक्तींना उद्देशून लिहिलेल्या कवितांचा आहे. यात मार्क्स, साल्वादोर दाली, कमर इक्बाल, अशोक वाजपेयी, वा.ल. कुलकर्णी, मनोहर ओक, नामदेव ढसाळ, सुधीर सोनाळकर यांच्यासाठी लिहिलेल्या कविता आहेत. यापैकी मनोहर ओकच्या शेवटच्या अवस्थेविषयीच्या कविता भन्नाट आहेत.

सोन्यासारखे हात माझे, भूक चावून चोथा सांभाळत
मी स्वत:तल्या एकेका ओवीचा अर्थ राह्यलोय आलापत

अशा अचूक शब्दांत मन्या ओक व्यापून राहतो. नामदेव ढसाळसाठीच्या 'सोदी: रांडेच्या इंद्रियाएवढीही नाहीय माझी कविता' हिची तर ग्रेट कवितांत गणना करायला हवी. वालंसाठीची 'मुली गवतावर बसल्या आहेत' ही या सर्वांहून अगदी वेगळी तरलपणे उतरलेली कविता आहे.

शेवटच्या टप्प्यात कवी सृष्टीच्या अगाधत्वापाशी येऊन ठेपतो. तिच्या सौंदर्याचा शोध घेत चिरंतन तत्त्व शोधतो. त्याचं आस्तिक्य स्थूलापासून सूक्ष्माकडे जात अध्यात्म सांगू लागतं. तो म्हणतो :

रे नम्रतेच्या अंगी
चंगीभंगी नसो
जिथे तिथे असो
शुभंकर

जातपात मिटून मरणाने जन्माला सत्संगाच्या लक्ष पाकळ्या फुटोत, असं तो म्हणतो. 'आता एकाच बोटावर झोका घेऊन कबुतराएवढं फुलपाखरु' होण्याची आस बाळगतो. एका प्रखर सामाजिकतेपासून सुरुवात करून शुभंकराच्या कैवल्यापर्यंत कवीचा प्रवास येतो.

तुळसी परब यांच्या कवितेची अनेक वैशिष्ट्ये या संग्रहात प्रकर्षाने प्रकटली आहेत. काही उत्तम व्यक्तिचित्रणात्मक कविता त्यांनी घडवल्या आहेत. उदाहरणार्थ सोजरा लुंगा पाटील यांच्यावरची कविता. परब एके ठिकाणी त्याचं वर्णन करतात :

त्याच्या देहाचे अभंग आळवले जायचे
भर पहाटे
आणि माझ्या ओढून झालेल्या सिगरेटचे
शेवटचे झुरके
तो घ्यायचा आनंदाने विठ्ठलाचा मुका घेतल्यागत

फाशी देणाऱ्या येरवडा तुरुंगातल्या अर्जुन जाधवांवरची कविता अशीच स्पर्शून जाते. याच कवितेत 'मानव्य आधीच सत्वाढ्य ढळलेलं' अशी ओळ ते लिहून जातात. त्यांची शब्दकळाही अनेकदा अनवट रूप घेते. ते एके ठिकाणी लिहितात :

आणि मी म्हणजे सगोत्र ओवरी,
सगळ्यांनी ओवाळून टाकलेली धरित्री

'लांच्छनसुख' असा शब्दप्रयोग ते करतात. 'हेलिकॉप्टरचं तेच तेच मरटेक भुंकणं' म्हणतात. त्यांची शब्दयोजना, त्यातले पलटे, नाद यांतून अनेकदा मनोहर ओक आठवत राहतात. त्यांच्या प्रेमकवितांमध्येही खूप सोसणं आहे, नाकारलं जाणं आहे, हताशा आहे, असोशी आहे आणि प्रगाढ समजूतदारपणाही आहे. स्त्री-पुरूष नात्याचे वेगळे पैलू त्यांच्या 'साधं नेहमीच्या सरावाने सुटणारं', 'कावळा बसतो', 'कोलाहल म्हणजे', 'प्रेमाचं सावट खपाटीला टेकलं', 'मी तुझा एक फोटो' अशा कवितांमधून समोर येतात.

अशा तऱ्हेनं एका कवीचं आयुष्याला समग्रपणे भिडणं आणि आयुष्याबरोबर आपणही व्यापक अन् उत्तरोत्तर खोल होत जाणं, समजूतदारपणे त्याचा स्वीकार करणं या संग्रहातून दिसत राहतं. वाचकही या श्रेष्ठ सर्जनापुढे नम्र होतो. या संग्रहाच्या मुखपृष्ठासाठी नामवंत चित्रकार सुधीर पटवर्धन यांचं 'द फॉल' हे चित्र निवडण्यात प्रकाशकांनी मोठंच औचित्य दाखवलं आहे.

Saturday, September 17, 2011

मुख्य धारेतला प्रवाह

- सतीश काळसेकर

(तुळसी परब विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले तेव्हा काळसेकरांचा हा लेख ‘लोकसत्ते’त प्रसिद्ध झाला होता.)

तुळसी परब येत्या विद्रोही साहित्य संमेलनाचा नियोजित अध्यक्ष आहे. त्याच्या या सन्मानात त्याच्या उपरोक्त वैचारिक भूमिकेचा आणि त्याच्या आजवरच्या कविता आणि कवितेतर चिकित्सक लेखनाचा सन्मान होत आहे. तुळसी परबच्या आजवरच्या जगण्याला आणि लेखनाला आरंभीचा काही काळ वगळता मार्क्सवादी विचाराची बैठक आहे. ती त्याच्या जगण्याच्या प्रत्येक व्यापारात पक्की मुरलेली तर आहेच आणि पुन्हा सतत गतिमान आणि विकसित होणारी आहे. आपल्या भोवतीचे सामाजिक जग आणि कवितानिर्मितीतली कवी म्हणून स्वीकारलेली ‘अख्खं आयुष्य पणाला लावलेली’ जबाबदारी याचे ताण आणि त्या ताणांचे संतुलन त्याच्या कवितेने पेलले आहे. किंबहुना या संदर्भात तो आजच्या मराठी कवितेत एकाकी उभा आहे. ‘साक्षात’च्या विशेषांकात त्याच्या पंचवीस नव्या कविता प्रकाशित झाल्या आहेत. त्याच्या कवितानिर्मितीचा विकसित आणि एकाकी आलेख त्या कवितांत पाहता येतो.
त्याचा पहिला कवितासंग्रह ‘हिल्लोळ’ 1973 साली प्रसिद्ध झाला. तो ‘अनितकालिकां’च्या उठावाचा काळ होता. नंतरचा ‘धादांत आणि सुप्रमेय मधल्या मधल्या मधल्या कविता’ हा 1977चा. त्यात त्याच्या शहादामधल्या पूर्ण वेळ कार्यकर्ता आणि आणीबाणीतला तुरुंगवास या काळाशी संबंधित कविता आहेत. काही काळाआधी ‘पाणी’ ही त्याची दीर्घ कविता आली होती आणि नंतर ‘कुबडा नार्सिसस’ मे 2002 हा अलीकडचा संग्रह. याशिवाय त्याच्या कितीतरी कविता अजून असंग्रहित आहेत. ‘कुबडा नार्सिसस’ संग्रहातल्या कविता या प्रदीर्घ काळातल्या कविता आहेत. तो काही काळ संघटनांच्या पातळीवर कृतीशील कार्यकर्ता म्हणून वावरला आणि काही काळ प्रत्यक्ष चळवळीपासून दूर असताना जगण्याच्या व्याप्यात पत्रकारिता केली, तरीही आरंभापासून त्याचा पिंड हा आधी पूर्ण वेळ कवी असण्याचा आहे हे नजरेआड करता येत नाही. अर्थात हे असे कवी असतानाच त्याच्या त्याही काळातल्या आरंभीच्या कवितात त्याच्या पुढच्या मार्क्सवादी असण्याच्या खुणा सापडतात. भवतालाच्या, शोषितांच्या, पीडितांच्या, वर्गीय पातळीवर तळाला असणाऱ्यांच्यात त्याची मुळे पसरणार हे अपरिहार्यच होते. प्रत्यक्ष जगणे आणि कविता यातले अंतर मिटवू पाहणाऱ्या त्याच्यातल्या कवीला जगण्याच्या लढाईत शोषितांच्याच बाजूने उतरणे निकडीचे होते. त्या वर्गाशी त्याची नाळ जन्मदत्तच जोडलेली होती.
‘हिल्लोळ’मधल्या कवितांपासूनच तुळसीच्या वर्गभानाचा प्रवास सुरू झाला आहे. ‘धादांत-’मध्ये त्याचा हा प्रवास खूप थेट आणि कविताबंधाबाबतही अधिक समजूतदार झाला आहे. नामदेव ढसाळची ‘प्रियदर्शनी’ ही कविता नामदेवच्या भूमिकेवर बिनतोड आणि नीट बांधलेली आहे. पण त्याच्यासमोरच तुळसीची ‘धादांत-’मधली एकसष्ट क्रमांकाची कविता ‘मला केवढं आवडेल, झारिना / तुला एकटीला रडताना पाहून’ ही कविता ठेवावयास हरकत नाही. त्यातल्या अखेरच्या ओळी ‘झारिना, तुला नाही दोष देता येणार / एकटीला कारण तू स्वीकारलयस / या दुधखुळ्या नाटकात मूळ काय’ या ओळी तुळसी परबचा समजूतदारपणा, करुणा आणि तरीही जागत्या मार्क्सवादी द्वंद्वात्मक भूमिकेचे भान अधोरेखित करतात.
त्याची आधी फोल्डरच्या आकारात प्रसिद्ध झालेली ‘पाणी’ ही दीर्घ कविता ‘कुबडा नार्सिसस’मध्ये आली आहे. त्या कवितेच्या नवव्या छेदातल्या या काही ओळी :
समष्टी
          सगळी कष्टीय :
हे सगळे पाण्याच्या पापाचे पाढे
मी वाचता वाचताच निग्रह
          विख्यात होत जातोय.
मी तुम्हाला सांगतोय
ती सगळी पाण्याची हकिगत नाही
ही हकिगत आहे
पातळ्यांवर
जगणाऱ्या दुर्दम्य माणसांची
ही एक प्रच्छन्न व्यथा आहे
नी नुक्ती नुक्ती मिटत चालली आहे
ती संपतेय खाणीतल्या हरताळात
ती हेलावतेय वरळीच्या बहिष्कारात
ती चाचपडतेय नक्सलबाडीच्या उठावात
ती हकीगत आहे
व्याकुळता सोडून सुदृढपणे जगाकडे पहाणारी
‘पाणी’ ही दीर्घ कविता पाण्याचे भूतकाळातले आणि वर्तमानकाळातले संदर्भ आणि संघर्षही जागे करणारी मराठीतली महत्त्वाची कविता आहे. कविता ही अशी काही ओळींतून आणि गद्यसदृश छपाईतून व्यक्त करणे कवितेला अन्यायकारक आहे. पण किमान तितके तुमच्यापर्यंत न्यावे यासाठीचा हा प्रयत्न केला.
तुळसीने मनोहर ओकच्या निमित्ताने लिहिलेले लेखन, त्याची ‘साक्षात’मधली मुलाखत, काही प्रकाशित-अप्रकाशित टिपणे, ‘भारतभवन’साठी झालेली त्याची मुलाखत आणि आणखी एखादा मोठा संग्रह प्रकाशित व्हावा इतक्या असंग्रहित कविता आता या निमित्ताने तरी एकत्र व्हाव्यात. त्याचे समकालीन वाङ्मयीन संस्कृतीवरचे भाष्य त्याच्या अध्यक्षीय भाषणातून समोर येईलच आणि तो आपणा सर्वांसाठी त्याच्या अध्यक्ष होण्याच्या सन्मानाचा आनुषंगिक फायदा असणार आहे. तुळसी परब त्याच्या कवितेवरील आणि शोषितांविषयीच्या अविचल निष्ठेमुळे आज सन्मानित झाला आहे.
सुरुवातीच्या अवतरणात तुळसी परब यांनी ‘मूलभूत लोकशाही आणि अनेकानुवर्तिता (प्लुरॅलिझम)’ यांचा उल्लेख केला आहे. ‘बहुजन जागा होत आहे’ याचे त्यांना भान आहे. त्यांच्या लेखनाच्या उमाळ्यांविषयी त्यांना सहानुभूती आहे. येत्या काळात हे जागे होत जाणे विस्तारतच जाणार आहे. मराठीची प्रस्थापित धाराही त्याला थोपवू शकणार नाही. प्रा. केशव मेश्राम यांचे नाशिकच्या संमेलनातले अध्यक्ष होणे हा आता अपघात किंवा योगायोग नाही. त्या आधीही घडलेल्या घटना आणि अध्यक्षीय निवडी हा अपघात किंवा योगायोग नाहीत. हे असे घडणे अपरिहार्यच आहे.
तुळसी परब हा आज मराठीच्या मुख्य आणि म्हणावे तर प्रस्थापित धारेतलाच विद्रोही सूर आहे. त्याची कविता, त्याचे अन्य लेखन, त्याचा साहित्यजगातला वावर याच्या स्वीकाराच्या खुणा खूप पाहता येतील. तुळसी परब हा कवी म्हणून त्याच्या जागी स्वतंत्र आणि एकटा आहे हे खरेच आहे. तुळसीच्या ‘सुप्रमेय्य’ या विभागातल्या पहिल्याच कवितेतील दोन ओळींनी त्याला शुभेच्छा देतो.
आणि कितीतरी महापुरुष लागतात मरायला
साधा एक जाणिवेचा पहिला थर विस्कटायला
.
तुळसीचे हे जागते भानच त्याची कविता पुढे नेणार आहे.

Thursday, September 15, 2011

तुळसी परब

(फेब्रुवारी २००५मधल्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तुळसी परब यांची निवड झाल्यानंतर ३१ डिसेंबर २००४ रोजी महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेला हा मजकूर)

मराठी साहित्यात साठोत्तरी पिढीने दिलेल्या योगदानात मोठा वाटा आहे, तो लघु अनियतकालिकांचा. 'वाचा', 'असो', 'येरु' अशा अनेक लघु अनियतकालिकांतून दिलीप चित्रे, नामदेव ढसाळ, मनोहर ओक, गुरुनाथ धुरी, चंद्रकान्त पाटील यांच्या सकस कविता येत.

यातच एक नाव होते, तुळसी परब. अर्थात यातले बहुतेक लेखक-कवी वाङ्मयीन चळवळीतच रमले. पण तुळसी परब यांनी साहित्यिक परिघाच्या बाहेर जात सामाजिक चळवळीत उडी घेऊन थेट समष्टीलाच भिडणे श्रेयस्कर मानले. त्यांची बंडखोरी ही सर्वांगीण होती.

त्याचीच याद ठेवून विद्रोही सांस्कृतिक चळवळीने त्यांना यंदा वाशी येथे भरणाऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद दिले आहे. तुळसी परब हे मुंबईतल्या कामगार वस्तीत वाढले. नामदेव ढसाळ आणि मनोहर ओक हे त्यांचे लिट्ल मॅगझिन काळातले बिरादर. परबांचा त्या काळात दलित पँथरशीही संबंध होता.

'हिल्लोळ' हा त्यांचा सुरुवातीचा काव्यसंग्रह कविवर्तुळात बहुचर्चित ठरला. त्या काळात परब मंत्रालयात नोकरी करत होते. साधारणपणे ७०-७२ सालाच्या आसपास तरुणांमध्ये सामाजिक कार्याचे वारे वाहू लागले होते.

जमीनदार-भांडवलदारांच्या शोषणाविरुद्ध उठाव करण्याची उर्मी त्यांच्यात निर्माण होऊन महाराष्ट्रात लोकचळवळी उभ्या राहात होत्या.

तुळसी परब, सुधीर बेडेकर, प्रफुल्ल बिडवई प्रभृतींचा 'मागोवा' नावाचा तरुण ग्रुप असाच कार्यरत हाता. त्यासुमारास धुळे, शहादा येथील शेतमजूर आणि आदिवासींच्या पिळवणुकीच्या कथा बाहेर येऊ लागल्या होत्या व त्यांच्यासाठी लढण्याचे आवाहन श्रमिक संघटनेने तरुणांना केले होते.

त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन एका भारावलेल्या अवस्थेत तुळसी परब आणि त्यांच्या ग्रुपमधले सहकारी शहाद्याला गेले. १९७३ ते ७९ हा कालखंड परब यांच्या आयुष्यातला एका नव्या संघर्षाच्या धुमाळीचा होता. या काळात ते शेतमजूर-आदिवासींसाठी कुमार शिराळकर, अंबरसिंग महाराज, दीनानाथ मनोहर, वाहरु सोनावणे यांच्या बरोबरीने लढले. तिथल्या जमीनदारांनी गुंडांकरवी मारहाण केली, तीही त्यांनी सहन केली.

परबांना आणीबाणीत 'मिसा'खाली अटक करून अठरा महिने तुरुंगात ठेवण्यात आले होते. या काळातल्या त्यांच्या तुरुंगातल्या कविता श्रेष्ठ दर्जाच्या आहेत. पुढे ते संगमनेर येथे विडी कामगारांच्या लढ्यात उतरले होते. 'धादांत आणि सुप्रमेय्य मधल्या मधल्या मधल्या कविता' आणि 'कुबडा नार्सिसस' हे त्यांचे दोन कलदार कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक पाश्चात्त्य कवींच्या कवितांचे अनुवादही केले आहेत.

त्यांच्या या कार्याचा 'विद्रोही'च्या अध्यक्षपदाने सन्मान होणार आहे.