Sunday, December 24, 2023

तुळसी परब : आठवणींच्या उजेडात

चंद्रकांत पाटील

'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये ३० सप्टेंबर २०२० रोजी प्रकाशित झालेला हा लेख पाटील यांच्या परवानगीने इथे नोंदवतो आहे.


तुळसी परब
तुळसी परब नावाचा एक कोमल कठीण हृदयाचा कवी कालवश होऊन चार वर्षे झालीत. तो जिवंत असता तर ३० सप्टेंबरला त्याला ८० वं वर्ष लागलं असतं. ऐन तारुण्यात तुळसीनं ज्याच्यासोबत साहित्यातली बंडखोरी केली त्या राजा ढालेची पण जन्म तारीख ३० सप्टेंबरच असावी हा विलक्षण योगायोग आहे.

तुळसीच्या कवितेला कारणीभूत झालेल्या त्याच्या आयुष्यातल्या चढउताराबद्दल स्थूलमानानं बऱ्याच लोकांना माहिती आहे. आरंभीच्या काळातल्या आयुष्यावर लिहिलेली सात तुकड्यातली एक मोठी कविता त्याच्या “हिल्लोळ” या पहिल्याच संग्रहात आहे. अगदी पहिल्यापासूनच उत्कट संवेदनशीलता, बालसुलभ कुतूहल, निसर्गाचं आकर्षण, स्वत:च्या भावनांकडे तिर्हाइतपणे बघण्याची मानसिकता आणि जगण्याचा, मरणाचा, नात्यांचा शोध घेण्याची वृत्ती असलेल्या तुळसीनं त्याला झालेलं मुंबईच्या जगाचं दर्शन आपल्या कवितेत शब्दांकित करण्याचा सतत प्रयत्न केला. पण हे शब्दांकन क्वचितच सामाजिक वास्तव म्हणून उघड उघड मांडलेलं आहे. त्याच्या बऱ्याच कविता ‘ इम्प्रेशनिस्टिक ‘ पद्धतीने लिहिलेल्या आहेत. त्याच्या मनातल्या संवेदनशील पटलावर उमटलेली ती चित्रं होती. त्याच्या काही कविता १९६३-६४ च्या सुमारास ‘सत्यकथे’त प्रकाशित झाल्या होत्या. ‘स्वप्नांची संगती लागत नाही जेव्हा सेवनटीसेवन / कुर्ला वार्डमधल्या सुजाण वस्तीत एक नवीन-/ झाड अचानक उमलते कुसुम् कोमल श्रावणधारांशिवाय /अचानक उगवते कुठल्याही सबबीशिवाय ’ या त्यातल्याच ‘झाड’ मधल्या सुंदर ओळी आहेत. मात्र नंतर त्यानं कधीही ‘सत्यकथे’त लिहिलं नाही. त्यामागे त्याची तात्विक भूमिका होती. तुळसीची तात्विक भूमिका म्हणजे कवी- लेखकांवर संपादकांनी व टीकाकारांनी लादलेली बंदिस्त चौकट झुगारून देणं आणि सौंदर्याचा व रूपाचा अतिरिक्त हव्यास असलेल्या साहित्यिक व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारणं. जगण्यातले फक्त ‘गाळीव’ अनुभवच घेऊन त्यांना चौकटीत बसवून सुशोभित करणं तुळसीला पटायचं नाही. याची मुळे तुळसीच्या त्या काळातल्या एका चौकटीबाहेर असलेल्या समूहसंबंधात होती. या समूहात मनोहर ओक, नामदेव ढसाळ आणि तो असा एक घट्ट त्रिकोण होता. शिवाय अरुण कोलटकर, अशोक शहाणे, भाऊ पाध्ये, राजा ढाले, वसंत दत्तात्रेय गुर्जर, सतीश काळसेकर,असे अवा गार्द लेखक-कवी होते. गुरुनाथ धुरी होता. आणि अगदी आत्मीय असे सुधाकर बोरकर, एकनाथ पाटीलही होते. या सगळ्यांमध्ये सतत साहित्यावर संवाद होत असे, झडझडून चर्चाही होत असे.

१९६३- ६६ तुळसीच्या आयुष्यातली महत्त्वाची वर्षं होती. या काळात मुंबई मराठी साहित्य संघाच्या महाविद्यालयात तुळसीने जे काही आत्मसात केलं त्यापेक्षा कितीतरी जास्त पट कीर्ती महाविद्यालयाच्या आणि मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयात तासन-तास बसून केलेल्या वाचनात मिळवलं. एझ्रा पौंड-रिल्केच्या कवितांसोबतच पाब्लो नेरुदा-बर्तोल्त ब्रेश्त कवितांशी भिडणं त्याला आवडायचं. तुळसीने भाषाशास्त्रात एम.ए. केलं होतं आणि त्यामुळे त्याचा मुळातच असलेला शब्द-संमोह जास्तच वाढीस लागला होता. त्याच्या शेवटच्या संग्रहातल्या कवितांमध्ये या शब्दसंमोहाची असंख्य उदाहरणं जागोजागी विखुरलेली दिसतात.

१९६०च्या सुरुवातीला अशोक शहाणे’ ‘असो’ नावाचं अनियतकालिक काढायचा. असोसोबतच ‘ आत्ता’ नावाची पर्णिका असायची. तिच्यावर ‘कल्पना: राधिका जयकर’ आणि ‘संपादन:राजा ढाले’ अशी नावं असायची. कालांतरानं पुढे राजा ढाले बरोबर ‘आत्ता मध्ये तुळसी परब आणि वसंत दत्तात्रेय गुर्जर अशीही नावं जोडली गेली. राजा, तुळसी आणि वसंत गुर्जर यांनी ‘येरू’ नावाच्या लघुनियतकालिकाचं संपादन केलं होतं. राजा आणि तुळसी हे बाबुराव बागुल यांनी १९७३ मध्ये संपादित केलेल्या एका दर्जेदार अशा ‘आम्ही’ नावाच्या दिवाळी अंकाचे सहसंपादक होते. याच अंकात भाऊ पाध्ये यांची एक दीर्घ मुलाखत आणि एक कथा होती; तीच कथा पुढे विस्तारून भाऊने ‘राडा’ नावाची कादंबरी लिहिली होती.

एम ए झाल्यावर तुळसीला सचिवालयात नोकरी मिळाली आणि त्याच्या जीवनाला स्थिरता येईल असं त्याच्या मित्रांना वाटलं. पण तुळसीचं मुक्त आयुष्य सचिवालयाच्या भिंतीत आणि फायलीत गुंतू शकलं नाही. मुंबईतल्या कामगार वस्तीत राहिल्यामुळे आणि महाविद्यालयीन व विद्यापीठीय जीवनामुळे त्याला समाजातल्या प्रचंड विषमतेची जी खोलवर जाणीव झालेली होती ती सचिवालयातल्या वातावरणात आणखी विस्तारली. याची संगती लावतानाच त्याच्या मनात मार्क्सवादी विचारांचं बीज रुजत गेलं. दाहक अनुभवांच्या आणि अभ्यासाच्या बळावर त्याला मार्क्सवादाचं अधिक आकलन होत गेलं. या अस्वस्थ काळात तुळसीला समुद्र जास्तच प्रिय वाटू लागला.समुद्राच्या खळाळत्या लाटांचा समोर, अथांगतेसमोर त्याच्याआत धडका देणाऱ्या अस्वस्थतेच्या लाटांना शांत करण्यासाठी तो रात्र रात्र समुद्रासमोर बसत असे. तुळसीच्या या विलक्षण समुद्रप्रेमाबद्दल आणि एकूणच आयुष्याबद्दल गुरुनाथ धुरीने ‘समुद्र’ नावाची एक अतिशय सुंदर कविता लिहिली आहे. तुळसीच्या अखेरच्या संग्रहातल्या एका कवितेतही तुळसीने लिहिले आहे “माझ्या हृदयात एक समुद्र असतो / मुठी एवढा”. दुसऱ्या एका कवितेत त्याने मजरूह सुलतानपुरीच्या ‘काला पानी’ मधल्या गझलेच्या दोन ओळी उद्धृत केल्या आहेत : “ हम बेखुदी में तुमको पुकारे चले गये / सागर में जिंदगी को उतारे चले गये “. यातल्या ‘सागर’च्या उर्दू आणि मराठी अशा दोन्ही अर्थांवर तुळसीचं गाढ प्रेम होतं. आपल्या प्रियतम समुद्राला सोडून तुळसी अचानक शहाद्याला गेला आणि श्रमिक संघटनेच्या कामात पूर्णपणे झोकून घेऊन तुळसीच्या आयुष्याचा सांधा बदलला. शहाद्याच्या जगात त्याच्या अनुभवक्षेत्राचा परीघ बराच फैलावला, जगण्यावरची श्रद्धा बळावली आणि क्रांतीशिवाय विषमता जाणं व समता येणं शक्यच नाही यावरचा त्याचा विश्वास घट्ट झाला. त्याच्या कवितेतली सुरूवातीची साहित्यकेंद्री अवस्था नेपथ्यात गेली आणि प्रखर वास्तवाच्या मंचावर आल्यामुळे त्याची कविता अधिकाधिक सरळ, सोपी, थेट भिडणारी होत गेली. मात्र काही वर्षांनी याही आयुष्याला आणखी एक कलाटणी मिळाली. तुळसीवर शहाद्यातील जमीनदारांच्या गुंडांनी प्राणघातक हल्ला केला. उपचारासाठी म्हणून त्याला काही महिने धुळ्याच्या सरकारी दवाखान्यात काढावे लागले. इस्पितळात एकाकी पडून राहणे म्हणजे स्वतःच्या आयुष्याचे थंड पुनरावलोकन करून भविष्याचा वेध घेण्यासाठी एक थांबा असतो. इथे असताना तुळसीची एक संस्मरणीय मुलाखत अनिल बांदेकरने घेतली होती. त्या मुलाखतीचा आणि तुळसीच्या ‘पाणी’ या एका अप्रतिम कवितेचा हिंदी अनुवाद रतलामहून निघणार्या “आवेग” या लघुनियतकालिकात छापून आला होता आणि त्याचं हिंदी वाचकांनी बरंच कौतुक केलं होतं. हिंदी साहित्यजगाशी आलेला तुळसीचा हा पहिला प्रसंग होता. या काळातल्या तुळसीच्या कविता प्रखर साम्यवादी विचाराशी बांधिलकी मानणाऱ्या होत्या. त्याच्या बांधिलकीच्या कवितांचा परमोच्च बिंदू त्याने आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगत असताना लिहिलेल्या कवितांत आहे. यातील काही निवडक कवितांचा एक छोटेखानी संग्रह “धादांत आणि सुप्रमेय्य मधल्या मधल्या मधल्या कविता” सुधाकर बोरकर या त्याच्या लाडक्या मित्रानं प्रकाशित केला होता. तुळसीची साम्यवादावरची निष्ठा पुस्तकी नव्हती. ती त्याला छळणाऱ्या प्रमेयांची उत्तरं शोधण्याच्या प्रयत्नातून आलेली होती. त्याच्याच भाषेत “लढायचंअसेल तर राजकारणाशिवाय अशक्य आहे...आधी नुसतीच कविता लिहिणं होतं. आता कवितेतून लोकांकडे आणि लोकांकडून कवितेकडे असा एक अखंड प्रवास सुरु झाला ...” साम्यवादी पूर्वसूरींच्या कवितांपासून त्याच्या कविता वेगळ्या होत्या त्या अनुभवांच्या मुळाशी जाऊन चिंतनामुळे दररोजचं जगणं आणि बाहेरच्या जगाचा, समाजाचा ताण यातला गुंता सोडवण्याच्या प्रयत्नात आलेलं राजकीयतेचं भान तुळसीच्या कवितेला स्वत:ची खास मुद्रा मिळवून देतं. म्हणूनच त्या काळी मी त्याच्याबद्दल “ समकालीन मराठी कवितेतला राजकीय जाणिवेचा पहिला कवी” असं म्हटलं होतं.

इथं तुळसीबद्दलची एक आठवण सांगितली पाहिजे. भोपाळच्या “भारत भवन”ने भारतातल्या वेगवेगळ्या भाषांमधल्या दर्जेदार कवींना निमंत्त्रित करून त्यांचं काव्यवाचन ठेवायचं, सोबत त्यांच्या कवितांचे हिंदी अनुवादही सादर करायचे आणि त्या जाहीर कार्यक्रमांचे व्हिडिओ करून ठेवायचे अशी एक व्यापक राष्ट्रीय योजना आखली होती. यातला पहिला कार्यक्रम पूर्व भारतातल्या कवींवर झाला आणि दुसरा कार्यक्रम ८,९,१० ऑगस्ट १९८२ ला आयोजित केला गेला होता. यात फक्त पश्चिम भारतातले कवी होते. ‘अपरा’ नावाच्या या कार्यक्रमात मराठीचे जुन्या पिढीतले मनमोहन, समकालीन पिढीचे तुळसी परब व नामदेव ढसाळ असे तीन कवी आणि लाभशंकर ठाकर, गुलाम मोहम्मद शेख आणि सीतांशू यशश्चंद्र असे गुजराथीतले प्रख्यात कवी आमंत्रित होते. हा कार्यक्रम दिलीप चित्रे भारतभवनच्या ‘वागर्थ’चा निदेशक होण्यापूर्वीच्या तीन-चार वर्ष आधीचा होता. या कार्यक्रमात तुळसीनं सादर केलेल्या तिन्ही कविता “ धादांत… “ मधल्या होत्या. मनमोहनांच्या कवितांनी फारच निराशा केली, नामदेव ढसाळ त्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे आलाच नाही. त्यामुळे तुळसीच्या कवितांबद्दल लोकांना फारशी उत्सुकता नव्हती. पण आश्चर्य म्हणजे तुळसीच्या कवितांना हॉलमध्ये गच्च भरलेल्या कविताप्रेमी रसिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्या मानानं लाभशंकर ठाकर वगळता कुणाचाही प्रभाव पडू शकला नाही. त्या तिन्ही दिवसांचं आकर्षणकेंद्र तुळसीच होता. त्यातच ‘कला वार्ता ’ या भारत भवनच्या नियतकालिकासाठी तुळसीची एक दीर्घ मुलाखत घ्यायचं ठरलं. ही मुलाखत आजचा आघाडीचा हिंदी कथाकार उदय प्रकाश आणि आघाडीचा हिंदी कवी मंगलेश डबराल यांनी घेतली होती. मुलाखत सुमारे चार तास चालली. ‘कला वार्ता’च्या नंतरच्या अंकात तुळसीचा एक भला मोठा फोटो छापून आला पण मुलाखत मात्र आली नाही. कारण मुलाखतीच्या टेप्स खराब झाल्यामुळे काहीही शब्दबद्ध होऊ शकले नाही.

तुळसी आणि वंदना सोनाळकरचं लग्न झालं तेव्हा वंदनानं नोकरी करायची आणि शहाद्याच्या हल्ल्यात शारीरिकदृष्ट्या जर्जर झालेल्या तुळसीनं कवितेत आणि साहित्यात पूर्णपणे स्वतःला गुंतून घ्यायचं असं ठरलं होतं. नोकरीच्या निमित्तानं वंदना आणि तुळसी औरंगाबादला आले आणि स्थिरावले. हळू हळू तुळसीच्या कवितेनं पुन्हा एकदा एक वेगळं वळण घेतलं. तुळसीला तसंही भौतिकतेच आकर्षण नव्हतं. त्याच्या गरजाही कमी होत्या. त्याच्या अंगावर जाडीभरडी खादी असे आणि ती त्याच्या बेबंद वाढलेल्या दाढीला मॅच होत असे. एका कवितेत त्यांनी लिहिलं आहे: “भौतिक मरण मेलो आधिभौतिक जीवन जगलो / संतांमधला आणि स्वत:मधला भेद विसरलो”. तरीही अधून मधून त्याला अपराधी वाटत असे; घरासाठी थोडीफार आर्थिक मदत केलीच पाहिजे या विचाराने तो चिंताग्रस्त होई. या जाणिवेतून त्यानं काही काळऔरंगाबादच्या एका दैनिकात नोकरीही केली. शिवाय नॅशनल बुक ट्रस्टसाठी एका प्रख्यात उडिया लेखकाच्या --बहुदा गोपीनाथ मोहांतीच्या- कादंबरीचा मराठी अनुवादही केला आणि त्यात त्याला थोडेफार पैसेही मिळाले, पण पुढे ती कादंबरी प्रकाशित झाली की नाही हे काही कळलंच नाही. नोकरीच्या शोधात काही दिवस मुंबईतही राहण्याचा त्यानं अयशस्वी प्रयत्न करून पाहिला. औरंगाबादच्या आयुष्यात पुन्हा एकदा कम्युनिस्ट पक्षात सक्रिय व्हायचा प्रयत्नही करून पाहिला, पण जन्मजात अस्वस्थता आणि अधून मधून उद्भवणाऱ्या शारीरिक यातना, विशेषतः हृदरोगामुळे, ते काही शक्य झालं नाही.

तुळसीचा पहिला छोटेखानी संग्रह ‘ हिल्लोळ” (१९७३, २०१३) वाचा प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला होता. त्यात त्याचा आत्मस्वरच प्रखर होता. दुसऱ्या “धादांत आणि सुप्रमेय्यमधल्या मधल्या मधल्या कविता” (१९७७,२०१३) संग्रहात तीव्र राजकीय जाणीव होती. तिसऱ्या “कुबडा नार्सिसस” (२००२) मधल्या अर्ध्या भागात “धादांत…” चा विस्तार होता तर उरलेल्या अर्ध्या भागात इम्प्रेशनिस्ट स्वरूपाच्या कविता होत्या. या संग्रहाचं मुखपृष्ठ त्याचा जवळचा मित्र आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचा चित्रकार सुधीर पटवर्धनचं होतं. तुळसीला चित्रकलेची सूक्ष्म जाण होतीच आणि त्याला आंतरिक नातं वाटायचं ते वॅन गॉख या ‘एक्सप्रेशनिस्ट’ चित्रकाराशी. वान गोखचं समुद्र आणि त्यातल्या दोन एकाकी बोटीचं फारसं प्रसिद्ध नसलेलं एक चित्र त्याला फार आवडत असे.

मधल्या काळात तुळसी शांत आहे आणि त्याच्या कविता मंदावल्या असाव्यात असं वाटत असतानाच त्याचा ३५१ कविता असलेला जाडजूड संग्रह “हृद” (२०१६) प्रकाशित झाला. या संग्रहातल्या कवितामध्ये तुळसीच्या कवितेनं आणखी एक वळण घेतलं होतं आणि त्याची कविता अधिक प्रौढ, अधिक गंभीर झाली . या संग्रहात त्याची भाषेशी असलेली लडिवाळ जवळीकही प्रकर्षानं दिसून येते. हा त्याच्या आणि मनोहर ओकच्या कवितांमधला एक समान धागा आहे. पण मनोहरच्या कवितांची आशयसूत्रे मात्र तुळसीच्या कवितांसारखी एकाच वेळी आत्मकेंद्री आणि लोककेंद्री नाहीत. तुळसीच्या कवितांचं नातं नामदेव ढसाळशी अधिक जुळणारं आहे. तुळसीनं “मनोहरच्या ८० कविता ” या संपादनात तुळसीने लिहिलेल्या लेखावरून मनोहरच्या कवितांची जशी उकल होते तशीच तुळसीची कवितेविषयीची सूक्ष्म आणि स्पष्ट जाणही लक्षात येते. ‘हृद्’ या संग्रहाचा आवाका बराच मोठा आहे. यात मरण, जगण्यातील गुंतागुंत, व्यक्ती आणि समष्टीतलं परस्परात रुतून बसलेलं नातं, यांचं व्यामिश्र स्वरूप आहे. महत्त्वाचं म्हणजे या संग्रहातल्या कवितांचा फार मोठा भाग ‘तू-मी’ वरच्या कवितांनी व्यापलेला आहे.. या प्रकारच्या एकूण ६५ कवितांत कुठेही मध्यमवर्गीय चाकोरीतल्या अभिरुचीने ग्रासलेली भावविवशता नाही. ‘तू- मी’ या स्त्री-पुरुष नात्यातली जटिलता आधिभौतिक पातळीवरून हाताळण्याचा तुळसीचा हा अद्भुत प्रयास आहे. भाषेच्या अंत:स्तराशी भिडण्याच्या तुळसीच्या अंगभूत सवयीमुळे आणि मनातल्या विलक्षण गुंतागुंतीमुळे या कविता काहीश्या दुर्बोध आणि अनाकलनीय पण झाल्या आहेत. साधारण वाचकांपासून ते कवितेच्या विशेष वाचकांसाठीही त्या आव्हानात्मकच आहेत.

तुळसीनं आईवर बऱ्याच कविता लिहिलेल्या आहेत आणि त्या सगळ्याच संग्रहांत विखुरलेल्या आहेत. आईच्या शेवटच्या रात्रीवर लिहिलेली त्याची एक अप्रतिम कविता पहिल्याच संग्रहात आहे. एखाद दुसऱ्या कवितेत वडिलांचा, वहिनीचा, मुलाचा, बायकोचा उल्लेख येतो. पण लोकांवर आणि मित्रांवर उत्कट प्रेम करणाऱ्या तुळसीच्या कित्येक कविता तुळसीनं मित्रांना आणि इतरांना समर्पित केल्या आहेत. यात मनोहर ओक आणि नामदेव ढसाळ बरोबरच तुरुंगातले सोजरा लुंगा पाटील सारखे कैदी आहेत, येरवडा जेल मधले अर्जुन जाधव आहेत, कार्ल मार्क्स आहे, ओर्तेगा आहे, हिमेनेझ्साराखा श्रेष्ठ कवी आहे ,साल्व्हादोर दली आहे, अशोक वाजपेयी आहे, कमर इकबाल नावाचा मराठवाड्यातला उर्दू कवी आहे, आणि वा.ल.कुलकर्णीसुद्धा आहेत. सुधाकर बोरकर आणि एकनाथ पाटील या मित्रांना तर पहिलाच संग्रह अर्पण केलेला आहे.

तुळसी आपल्याच शर्तींवर उत्कटपणे जगला, उत्कटपणे राजकीय बांधिलकीवर प्रेम केलं, त्याची किंमतही चुकवली. जगणं आणि कविता यातलं द्वैत मिटवण्याचा प्रयत्न केला. भाषा पणाला लावली आणि लिहिलं . शेवटी भाषा पणाला लावणे हा कवितेचा एक (पण एकमेव नव्हे) निकष असेल तर तुळसीची कविता श्रेष्ठतेच्या जवळ जाणारी आहे हे नक्कीच. तुळसीची कविता आजच्या सार्वत्रिक वातावरणात किती अगत्याची आहे हे त्याच्या कवितेचं समग्र आकलन केल्याशिवाय नव्या पिढीला कळणेच शक्य नाही.

Friday, December 8, 2023

Four Poems translated in English

This English translation of the four of Tulsi Parab's poems is done by Aniket Jaaware, and was published in: Comparative Studies of South Asia, Africa and the Middle East, Duke University Press, Volume 36, Number 3, December 2016. pp. 503-504. Available Project Muse.

Subhash Night Middle School, Third Period

Guileless, with smallpox scars on his face A hedge of grief around the eyes Freedom was sitting in class Nobody had promoted him last year

I was substituting Was going to teach Khandekar, “Two Clouds” With the hollow utterance of idealism and loyalty I saw the children’s faces craquelured like ice

Today I have constructed this interior so blue through words, in front of this laboring class They do not know class struggle They haven’t peeked into the mirror of Camus

They get another pair of shoes After they pack one shoebox To climb up the earlier hill backwards

Shall I tell them the story of Sisyphus Or shall I tell them that in the cave of existence The sun and moon are not as bright as us? Or shall I ask them obvious children’s questions: How old are you today? Is freedom the birthright of everyone? 

That honest simple pockmarked darkish child Scolds me with his stick-thin palm “T B is my birthright”; It says from the corner.

I teach them: “Say T B is my birthright” We are the inheritors of poverty We are oceans of tears In which drowned completely icebergs of grief We are the luxury of malaria And heritaged householders in mud

I teach: The law that I have a birthright is not new Insects and creatures are our brethren, along with hunger.

    — From Hillol (1973)


The Plates Are Broken

the plates are broken and broken are the cups the earthen jars are broken and broken the bowls he, who occasionally had to starve shared his food, cracked too

died hungry, is gone he and hunger were close friends

    — From Hrud (2016)


First Coated Them with Clay

First coated them with clay and then dried them in the sun and then mixed them with form my words

first sprinkled blood on them and fed them on oaths had borne all the blows your answer

then eternally demanded having persuaded each other before you me and I you became one

in all, then, we leapt upon all the scimitars

    — from Hrud (2016)


More Circles Internal to the Circle

More circles internal to the circle These shone away into a miracle 

one remained, reclining,  

sliding on, your ring.

    — From Hrud (2016) 


The translator thanks Urmila Bhirdikar for her inputs.

Tuesday, July 5, 2016

तुळसी परब गेले

तुळसी परब यांचं ५ जुलै २०१६ रोजी मुंबईत चेंबूर इथं खाजगी रुग्णालयात निधन झालं. त्यांनी देहदान केलेलं, त्यामुळं त्यांचा मृत्यूनंतर उरलेला देह सोमय्या रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आला, असं आजची वर्तमानपत्र सांगतात.

त्यांचा एक नवा आणि सध्यातरी शेवटचा ठरलेला कवितासंग्रह ('अॅमेझॉन'वर उपलब्ध) अलीकडेच दोन-तीन महिन्यांच्या काळात 'कॉपर-कॉइन पब्लिशिंग'तर्फे प्रकाशित झाला:

हृद, २०१६

Saturday, May 30, 2015

दोन कवितासंग्रहांच्या दुसऱ्या आवृत्त्या

परबांच्या 'हिल्लोळ' आणि 'धादान्त आणि सुप्रमेय्य मधल्या मधल्यामधल्या कविता' या दोन कवितासंग्रहांच्या दुसऱ्या आवृत्त्या औरंगाबादमधल्या 'साक्षात प्रकाशना'नं ऑगस्ट २०१३मध्ये काढल्या. त्यांची मुखपृष्ठं आणि सोबत मलपृष्ठावर छापलेला मजकूर या नोंदीत एकत्र करून ठेवूया.
***

हिल्लोळ

मुखपृष्ठ- संतुक गोलेगावकर । किंमत- ५० रुपये
कल्पित आणि रंजक साहित्यातून प्रकटणाऱ्या कृत्रिम दुःखाची आणि तथाकथित बुद्धिमंतांच्या वांझोट्या तत्त्वप्रदर्शनाची चिरफाड करणारी तुळसी परब यांची कविता भोवतालचे वास्तव आणि स्वतःचे अस्तित्व यांच्या खाणाखुणा अंगभर गोंदवलेली कविता आहे. अनियतकालिकांची चळवळ आणि दलित जाणिवांचे संवेदन प्रकटण्याच्या काळातच या कवितेने दारिद्र्य, शोषण, स्वातंत्र्य, पाणी, आदिवासींचे जीवन, अशा असंख्य विषयांना कवेत पकडण्याचे सामर्थ्य अभिव्यक्त केले आहे. विषयवस्तू, ध्वनीरचना आणि तात्त्विक दृष्टी या अंगानी दलित कवितेशी ती जवळीक साधते; मात्र विद्रोहाचा तीव्रतर उच्चार ती करीत नाही. चोरचिलटे, हप्तेबाज पोलीस, रांडा, पक्षी यांची जिवंत सृष्टी आणि गेट वे, समुद्र, म्युझियम्स, सिग्नल, स्लम, वेश्यापुरी, ही अविभाज्य अंगं असणारी महानगरीय ठिकाणी यांची गजबज चितारण्याची हातोटी व क्षमता या कवितेने दाखवून दिली आहे. 'स्वातंत्र्य हा सर्वांचाच जन्मसिद्ध हक्क असतो काय?' या मूलभूत प्रश्नालाच केंद्रस्थानी आणल्याने भुकेकंगालांच्या दुनियेतील दुःखाजी गाज तुळसी परब यांच्या कवितेतून सतत ऐकू येते. तथागत बुद्धाच्या आणि दयाघन संतांच्या डोळ्यांतून पाझरणारी करुणा या कवितेच्या नसानसांतून वाहत असल्याने वेदनांचे अंतःस्वर आणि अंतर्यामातून उचंबळून ओसंडून बाहेर पडणारा वेदनांचा आर्त उद्गार हेच 'हिल्लोळ'चे बलस्थान ठरते. घराघरातील किडामुंगी, जीवजंतू यांच्या भुकेशी नाते जोडत संपूर्ण मानवजातीला या कवितेने घातलेली बंधुत्वाची हाक हाच कोट्यवधी दुःखितांचा जाहीरनामा बनतो. म्हणूनच सामाजिक उत्थानासाठी झटणाऱ्या एका कार्यकर्त्याची ही केवएळ शब्दांमधून उमलणारी कविता नसून अस्सल माणूसपणाची मोहोर उमटवणारी जितीजागती निशाणी आहे, असे म्हणणे भाग पडते.
- सतीश बडवे
***

धादान्त आणि सुप्रमेय्य मधल्या मधल्यामधल्या कविता

मुखपृष्ठ- संतुक गोलेगावकर । किंमत- ५० रुपये
तुळसी परब यांच्या 'धादान्त आणि सुप्रमेय्य मधल्या मधल्यामधल्या कविता' या दुसऱ्या कवितासंग्रहातील कविता या कारावासातील कविता आहेत. 'हिल्लोळ'मधील अनेस संदर्भांचा येथे लोप झालेला दिसतो तर काहींचा संकोच झालेला दिसतो. महानगरी जाणिवांतून आलेली नकारात्मकता बरीचशी अध्याहृत झालेली दिसते आणि महानगरी संस्कृतीची जागा कारावासातील संस्कृतीने घेतलेली दिसते. कविस्वप्नातील काव्यात्मक पेच याही संग्रहात पुढे चालू राहतो; पण त्याला सामाजिक जाणिवेची एक विस्तृत चौकट लाभते. परब यांना लागलेला अमर गाण्याचा ध्यास, सुहास-साजणीच्या प्रेमाचा ध्यास आणि मृत्यूची नव्या रूपातील जाणीव या संग्रहातही तेवढीच जिवंत आहे; पण या सर्व जाणिवांना एका सर्वव्यापी सामाजिक आणि राजकीय जाणिवेचा अंकुश आहे. बंदिवासातील मानसिक दबावाचे वातावरण आणि त्यात होणारा कवीचा मानसिक कोंडमारा हा या कवितांचा स्थायीभाव आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर कवीचे व्यक्तिगत स्वप्न आणि त्याची सामाजिक-राजकीय जाणीव यांच्यातील आंतरप्रक्रियेला विशेष अशी काव्यात्मकता लाभते. म्हणून परब यांच्या कवितेतील या स्थित्यंतराचे स्वरूप लक्षात घेणे महत्त्वाचे आहे
- प्रकाश देशपांडे केजकर
***

Thursday, September 29, 2011

५ मार्च १९६९ : एक पत्रक

'सत्यकथा' या वाङ्मयीन मासिकाची प्रतिकात्मक होळी करून करून प्रस्थापित व्यवस्थेवरचा आपला राग व्यक्त करण्याचा प्रयत्न अनियतकालिकांशी संबंधित काही 'तापसी तरुणां'नी केला. या सगळ्या साठच्या दशकातल्या गोष्टी. मराठी लोकांच्या एकूण सांस्कृतिकपणाला साचलेपणा आलाय, काही मोजक्या लोकांपुरतंच हे सगळं मर्यादित राहिलंय, तर ही कोंडी फोडूया, असं लक्षात आल्याने या लोकांनी काहीनाकाही करण्याचा प्रयत्न केला. साहित्यातून आणि यातल्या काहींनी नंतर राजकीय भूमिका घेऊन हे करण्याचा प्रयत्न केला. आता लोक विसरूनसुद्धा गेले. मुळात अनेक गोष्टी, संदर्भ पूर्णपणे बदलूनही गेले. तूर्तास हे एक पत्रक, थोडा अंदाज येण्यासाठी-- (अजून थोडे संदर्भ इथे स्पष्ट होतील). या पत्रकात सगळीच नावं आल्येत असं नाही, त्यामुळे या पत्रकावरून कोणी अति अंदाज बांधण्याचा प्रयत्न करू नये, या ब्लॉगची सुरुवात या पत्रकाने करणं जरा बरं वाटल्याने तसं केलंय.
***

जाहीर बोलावणे

श्री.........यांस,
आमचे येथे आमचे कृपेकरून मराठीतील उच्चभ्रू मासिकांची होळी करण्याचे घाटत आहे. या निमित्ताने सत्यकथेच्या एका अंकाची होळी केली जाईल. या प्रसंगी सुप्रसिद्ध तापसी तरुण हजर राहतील. उदाहरणार्थ विख्यात बोंबलभाड्या राजा ढाले : थोर बोंबलभिके अशोक शहाणे + भालचंद नेमाडे + रमेश रघुवंशी + एकनाथ पाटील + तुळसी परब + वसंत गुर्जर. तरी दिनांक पाच मार्च एकोणिशेएकोणसत्तर रोजी ठीक सायंकाळी सहा वाजता खटाववाडीच्या गल्लीत इष्ट मित्र-मैत्रिणींसह उपस्थित राहून या मंगल समारंभाला शोभा आणावी.

- राजा ढाले, तुळसी परब, वसंत गुर्जर

***

हा ब्लॉग कवी तुळसी परब यांच्याविषयी काही गोष्टी एकत्र जमवून ठेवण्याचा प्रयत्न आहे.

Monday, September 26, 2011

तुळसीबद्दल

- वंदना सोनाळकर
'साक्षात' (जानेवारी-फेब्रुवारी-मार्च २००४) तुळसी परब विशेषांकामधून

ज्या माणसाबरोबर आपण पंचवीस वर्षं संसार केला आहे त्याच्याविषयी लिहायचे तर मला स्वतःबद्दल आणि आमच्या कुटुंबाबद्दलही लिहावे लागेल. कदाचित या अंकाच्या वाचकांना याच्यात फारसा रस नसेल. परंतु जसा एखादा पर्यटक 'पॅकेज टूर'चे पैसे भरतो आणि त्याला व्यवस्थापकांनी निवडलेल्या सर्व स्थळांना भेट द्यावीच लागते त्याचप्रमाणे इथे कवीबद्दल वाचताना वाचकांना एक अर्थशास्त्राची शिक्षिका, एक नुकताच पदवी मिळालेला वास्तुशिल्पकार (ओजस) आणि एक दहावीतला विद्यार्थी (दर्यन) यांचीही भेट घ्यावी लागेल. हा केवळ एक स्त्रीवादी हट्ट नाही.

पंचवीस वर्षांचा काळ मोठा आहे. १९७७ ते २००२ हा काळ कवी तुळसी परब यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कवितासंग्रहामधील अंतराचा देखील आहे. कवीच्या जीवनात या काळात बरेच काही घडले, त्याबरोबर जगात आणि आपल्या समाजातही मोठे बदल झाले आहेत. कोणत्याही चांगल्या लेखकाच्या लेखनात या बदलांचे प्रतिध्वनी सापडतातच. आणि ज्या कवीच्या वैशिष्ट्यांमध्ये त्याची राजकीय बांधिलकी, त्याची समाजाभिमुख भूमिका यांचा प्रकर्षाने उल्लेख केला जातो, अशा कवीच्या जीवनात त्यांना महत्त्वाची जागा आहे. तो या बदलांना कसा सामोरा जातो, त्यांचे धक्के खातो, उभा राहतो, स्वतःला बदलतो किंवा बदलण्यास नकार देतो, हे सर्व मी जवळून पाहिले आहे. ३१ ऑक्टोबर १९७७ रोजी आमचे लग्न झाले. आम्ही विवाहबद्ध झालो, सहजीवन पत्करले. शब्द कोणतेही वापरा. तेव्हा इंदिरा गांधींची आणीबाणी नुकतीच संपुष्टात आली होती. मिसा (मेन्टेनन्स ऑफ इंटर्नल सिक्युरिटी अॅक्ट) खाली दहा महिन्यांचा कारावास सोसून तुळसी परब मार्चमध्ये बाहेर आले होते. इंदिरा गांधींच्या सरकारचा पराभव करणाऱ्या युतीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही देशाच्या राजकारणात पुन्हा प्रवेश मिळाला होता. या घटनेचे महत्त्व आम्हाला त्यावेळी लक्षात आले नव्हते.

त्यावेळी मी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर कॉलेजमध्ये शिकवत होते. मी १९७४ साली इंग्लंडहून परतले होते. त्याआधी मी लहानपणापासूनचा जवळजवळ सर्वच काळ परदेशात राहिले होते. संगमनेरसारख्या ठिकाणी नोकरी करण्याचा माझा निर्णय आणि तुळसीबरोबर लग्न करण्याचा निर्णय, हे दोन्ही धाडसाचे निर्णय होते असे म्हणता येईल. तुळसीचेही तेवढेच धाडस. मागे पाहताना असे वाटते की, एका बाजूला आम्ही दोघे अगदी एकमेकांशी जमीन-आसमानचा फरक असलेल्या वातावरणात लहानाचे मोठे झालो असलो, तरी दोघांमध्ये एक गोष्ट समान होती. दोघेही शहरी संस्कृतीत वाढलो, मात्र दोघांनीही ग्रामीण भागात राहून काम करणे पत्करले होते.

नंतर तुळसीच्या काही साहित्यिक मित्रांनी सुचविल्याप्रमाणे औरंगाबादेत विद्यापीठाची नोकरी मिळवली आणि आम्ही औरंगाबादेत १९७९ साली आलो. तेव्हापासून दोन-तीन वर्षे सोडली तर आम्ही इथेच आहोत.

तुळसीच्या स्वभावामध्ये एक विशिष्ट प्रकारचा विरोधाभास आहे. एका बाजूला त्याची साहित्य व दृष्य कलांची जाण प्रगल्भतेची, सूक्ष्मतेची आहे, तो नवीन कलाकृतींना स्वीकारण्यास नेहमी तयार असतो. दुसऱ्या बाजूला त्याच्या भाषेत आणि वागणुकीत जो रांगडेपणा आहे, तो जपण्यासाठी तो जीवापाड प्रयत्न करायला तयार असतो. त्यामुळे आमच्या सहजीवनाच्या काळात चढउतार झाले असतील, काही काळ आमच्या तीव्र संघर्ष झाला असेल, पण त्या एकत्र जगण्यात तोचतोचपणा किंवा कंटाळा याला काही जागा राहिली नाही.

आमच्या घरात सतत वाद चालू असतात आणि तेही बऱ्याचदा उच्च स्वरात. आम्ही दोघेही आपला मुद्दा सोडायला, पराभव स्वीकारायला फारसे तयार नसतो. तरीही आम्ही एकमेकांच्या म्हणण्याला किंमत देत नाही असे नाही. आमचे जवळचे मित्र प्रताप भोसले सुरुवातीच्या काळात असे म्हणायचे की, तुमच्या भांडणातून मला काही शिकायला मिळते. अर्थात आमच्या दोन्ही मुलांवर या वातावरणाचा प्रभाव पडला आहे. त्यामुळे ते देखील आमच्याशी उच्च स्वरात वाद घालायला मागेपुढे बघत नाहीत. त्यात तुळसीच्या तोंडात शिव्याही सहजपणे येतात आणि आपली बाजू कमजोर असली तर तो विवेकाचा त्याग करण्यात तत्परही असतो. तरी हा सगळा प्रकार भांडणापेक्षा वादाचाच असतो. आमचे सगळे काही एकमेकांसमोर अगदी उघड होत असते. तत्त्वांचा, सवयींचा, मूळ हेतूंचा, आवडीनिवडींचा आडवा तिडवा विचार केला जातो. यात कधीच कटुता येत नाही असे नाही. मोठ्या मुलाचा स्वभाव मुळात शांत असल्यामुळे त्याला बऱ्याच तडजोडी करून काही गोष्टी विनोदाने घेण्याचे शिकावे लागले. धाकटा मात्र तुळसीचीच रणनीती त्याच्यावर उलटवायला शिकला आहे. आणि या सर्व प्रकरणातून एक लवचिकता, खुलेपणा, स्वातंत्र्य, कसे माहीत नाही, पोचसे जाते सगळ्यांसाठी.

अर्थात या सगळ्या तीव्रतेने नटलेल्या सततच्या कौटुंबिक देवाणघेवाणीची एक किंमतही द्यावी लागते. आम्ही दोघे आपल्या क्षेत्रात काबिल असूनही फारसे महत्त्वाकांक्षी राहिलो नाही. याचाच परिणाम, तुळसीचा तिसरा संग्रह निघायला पंचवीस वर्षे लागण्यामध्ये आणि माझे करिअर पुढे न सरकरण्यामध्ये दिसून येतो.

तुळसीच्या या तिसऱ्या संग्रहाच्या काही परीक्षकांनी त्याच्या स्त्रियांविषयीच्या दृष्टिकोनाची प्रशंसा केली आहे. हे वाचून मला पहिल्यांदा थोडासा धक्का बसला, मात्र विचार केल्यानंतर फारसे आश्चर्य वाटले नाही. तुळसीच्या तोंडातून अनेकदा अत्यंत पुरुषप्रधान अशी विधाने बाहेर पडतात. त्याचे वर्तनही तसे असते. परंतु या सगळ्यामागे तुळसीच्या काही भूमिका असतात. एक, तो स्वतःला बदलायला तयार असतो. फार सहजपणे नाही, पण कालांतराने तो बदलतो. दुसरी गोष्ट म्हणजे, त्याची वागणूक ही वर्ग-जात-लिंगभाव-सदृश अस्तित्वात पाय रोवलेली असते. तो ज्या वातावरणात आणि वास्तवात लहानाचा मोठा झाला, त्याने तारुण्यात जी मूल्ये स्वीकारली, त्यांच्यापासून फारकत घ्यायला तो सहजासहजी तयार होत नाही. तो एका विशिष्ट काळात मुंबईतील कामगार वस्तीत एका चाळीत वाढला, त्या वास्तवाशी त्याची बांधिलकी पूर्णपणे तुटत नाही. तो आज एक मध्यमवर्गीय जीवन जगत असला तरी या जीवनाशी तो कधीच समरस होत नाही. एका कामगारवर्गीय पुरुषाला एका सुखवस्तू जीवन जगलेल्या उच्चवर्णीय स्त्रीबद्दल जो संशय वाटतो, तो तुळसी नाहीसा होऊ देत नाही. वैयक्तिक पातळीवर दीर्घकाळ सहजीवनातून एक मोठा विश्वास दोन्ही बाजूने निर्माण झाला असला तरी. या भूमिकेचा मला बराच त्रास झाला आहे हे नाकारता येणार नाही. काही काळ मला स्वतःची सृजनशीलता जपण्यासाठी त्याच्यापासून जरा अंतर घेऊन राहणेही जरूरीचे वाटले आहे. मात्र तुळसीचा मोठेपणा याच्यात आहे की, मी जेव्हा इंग्रजीत वयाच्या चाळीशीनंतर काही कविता लिहिल्या तेव्हा त्याने त्याचे मनापासून कौतुक केले. माझ्या दोन-तीन कविता एका प्रतिष्ठित त्रैमासिकात छापून आल्या तेव्हा तो माझ्या आनंदात पूर्णपणे सामील झाला. मला कामाच्या निमित्ताने देशभर प्रवास करण्याची संधी मिळाली तेव्हा त्याने कधी तक्रार केली नाही.

तुळसीला शहरात फिरण्याचा मोठा शौक. आणि तेही पायी. अर्थात, महाराष्ट्रात मुंबई सोडून दुसरे खरे शहर नाही असे त्याचे मत आहे. तरी तो औरंगाबादेत असाच शौक म्हणून फिरतो. आमचा मोठा मुलगा ओजस लहान होता तेव्हा तो त्यालाही बरोबर घेऊन शहरामध्ये फिरायचा. कधीकधी 'आज शाळेत नको जाऊस. आपण फिरू या. शाळेत जेवढे शिकता येते, त्याच्यापेक्षा जास्त शाळेबाहेरही शिकायला मिळते', असे त्याचे म्हणणे असते. अर्थात मीही या 'मधून-मधून शाळा बुडवण्याच्या' छंदाला कधी विरोध केला नाही. असा तो फिरून आल्यावर आपण जर विचारले, कुठे गेलास, काय केलेस, कोण भेटले, तर याचे सरळ उत्तर मिळणार नाही. तो काहीतरी काम पूर्ण करण्यासाठी जरी बाहेर पडला असला, तरी ते झाले का? असे विचारल्यावर सोपे उत्तर मिळत नाही. तो कसा अमूक अमूक ठिकाणी गेला, मग तिथली माणसे कशी होत, ते काय काय म्हणाले, एवढेच नाही तर च्यायला ते असे का बोलले आणि आपण त्यावर काय बोललो, हे त्याच्या पद्धतीने त्याच्या वेगाने ऐकावे लागतेच. अगदी आपल्या हातात घड्याळ नसले आणि किती वाजले विचारले तरी असेच. अशा प्रकारे त्याच्याबरोबर, म्हणजे त्याच्यामागे पुन्हा शहरभर फिरून यायला कधी मजाही वाटते, पण हे सगळे ऐकत बसायला नेहमीच वेळ असतो का? आणि त्याच्या पिढीतल्या बहुसंख्य नवऱ्यांप्रमाणे, घरातली कामे करताना, आपण ही कामे करतो ही अगदी मोठ तात्विक भाषण देण्याजोगी अजब घटना आहे, असेही असते आणि शेवटी मी हे करतो ही काय अजब गोष्ट आहे का? मी तर हे अनेक वर्षांपासून रोजच करतोय... वगैरे.

आमचे लग्न झाले तेव्हा तुळसीची युरोपीय कवितांची जाण पाहून मी चकीतच झाले होते. त्या काळात पुस्तकं स्वस्त होती आणि त्याच्याकडे मार्क्सवादी साहित्याचा आणि कवितांचा मोठा संग्रह होता. आम्ही या दोन्ही प्रकारच्या पुस्तकांचे एकत्र वाचनही केले. नंतर फारसा वेळ मिळाला नाही, तरी तुळसीकडून कविता वाचून घेण्यात मी अजूनही रमते. ग्रंथालयात आठ आठ तास बसून वाचण्याची आवड तुळसी अलिकडे वरचेवर जोपासू शकला नाही. पण त्याचे वाचन सतत चालू असते. ते सगळे गांभीर्याचे असते. तो विनोदी लेखन क्वचितच वाचतो, 'पॉप्युलर फिक्शन'ला हातही लावत नाही. आणि जे काही वाचलेले असेल ते त्याला सांगायचेही असते. मनाला ताण आल्यावर तुळसीला 'मारामारीचे' विशेष म्हणजे अमिताभ बच्चनचे चित्रपट टी.व्ही.वर पाहायला आवडतात. आणि तो या चित्रपटांच्या कथनकामध्ये अगदी लहान मुलासारखा मग्न होतो.

विज्ञान हे आपले क्षेत्र नाही, वैज्ञानिक बाबींच्या तपशिलात आपल्याला रस नाही, ही तुळसीची ठाम भूमिका असते. घरातल्या विजेच्या उपकरणांबरोबर त्याचे नाते मुळात संशय आणि किंचित भीतीचे असते. पण याबाबतच्या सुरक्षिततेचे पथ्य तो अगदी काळजीपूर्वक आणि काटेकोर पद्धतीने पाळतो. घरातल्या संगणकापासून तो दोन वर्षांच्या काळात जरा फटकूनच राहिला आहे. तात्विक पातळीवर तो विज्ञानाच्या नवीन शोधांबद्दल खुलं मन ठेवतो, पण तपशील समजून घेण्याची तसदी घेत नाही. तात्विक पातळीवर नास्तिक असणे, अंधश्रद्धांना विरोध करणे हा त्याच्या तरुणपणातील बंडाचा भाग होता आणि आजही त्याच्यासाठी ते महत्त्वाचे आहे. जिथे तो मोठा झाला तेथील कामगार वर्गीय कोकणी संस्कृती, लोकांचा भुताखेतांवरचा विश्वास, एकमेकांविषयीचा संशय, एकमेकांमध्ये गुंतण्याची पद्धत या सगळ्यांच्या विरोधात त्याने बंड केले आहे आणि तरीही त्याचा एक भावनिक प्रतिध्वनी त्याच्या बोलण्याच्या लयीत, त्याच्या वागणुकीत अजूनही उमटतो. हा एक विरोधाभास वाटला, परंतु कवी म्हणून त्याच्या लेखनात या गोष्टी एक बहुसूत्रीपणा आणतात. तुळसी एक व्यक्ती म्हणून अनेकदा काही भूमिकांना अगदी हट्टीपणाने धरून ठेवतो, मात्र त्याचे कलात्मक विश्व त्यापेक्षा गुंतागुंतीचे असते. हे समजायला मला अनेक वर्षे लागली. जेव्हा मी तुळसीला, त्याच्या घराच्या माणसांना अगदी जवळून पाहिले आणि त्यांच्याशी भावनिक नाते जोडले तेव्हा ते शक्य झाले.

कोणतीही नवीन गोष्ट स्वीकारताना किंवा नाकारताना तुळसीने जगाशी वागताना स्वीकारलेली भूमिका त्याच्यासाठी महत्त्वाची असते. मग अगदी डॉक्टरकडे जाण्यासारखा साधा प्रसंग असला तरी हॉस्पिटलची प्रशासनपद्धती आणि त्यातील विविध पात्रे, डॉक्टरची रुग्णांशी वागण्या-बोलण्याची पद्धत, इतर रुग्णांचे वर्तन, या सगळ्यांना त्याला तीव्र वैयक्तिक आणि 'इगोवादी' प्रतिसाद द्यायचा असतो. हे सगळे खूप व्यक्तिकेंद्री वाटेल. पण तुळसीची ही स्वतःची भूमिकासुद्धा एक रचलेला आविष्कार आहे. त्याला अनेक पैलू आहेत. पण त्यात एक सामान्य जनतेतला, सत्तेपासून दूर असलेला माणूस-पुरूष हा एक अविभाज्य भाग असतो. मग डॉक्टर, पोलिस, साहित्यिक पुरस्कारांची निवड मंडळे, हे सर्व प्रतिष्ठित वर्गाचे प्रतिनिधी आहेत, ते कधीच आपल्या बाजूने असू शकत नाहीत, असे गृहीत धरून तो वागत असतो. तरी मी त्याला एक-दोन डॉक्टरांबरोबर अगदी वैशिष्ट्यपूर्ण नाते जोडलेलेही पाहिले आहे. दहा-बारा वर्षांपूर्वी त्याला हृदयविकार असल्याचे उघडकीस आले तेव्हा पाच-सहा महिने प्रयत्न करून अनेक वर्षांपासून असलेली सिगारेटची सवय त्याने पूर्णपणे सोडली. नंतर इसीजी, थ्री डी इको, स्ट्रेस टेस्ट आणि नियमितपणे गोळ्या घेणे या अनुभवाला त्याने आपलेसे केले.

स्वतःच्या 'इमेज'ची मोठी रचलेली इमारत नेहमीच पाठीवर बाळगून वावरणे अनेकदा कठीण होते. तुळसी आता कार्यकर्ता राहिला नाही, समाजात वावरण्याची एक स्वतंत्र सहजता वयाने, घरच्या जबाबदारीने, प्रकृतीने, जगात आणि समाजात झालेल्या बदलांनी, कालांतराने कमी केली आहे, याचा त्याला अजूनही त्रास होतो. याचा राग अनेकदा पत्नीवर उतरत असतोही. तरी तो त्याच्या पद्धतीने नवीन सामाजिक नाती जोडण्याचा प्रयत्न करत असतो. यात काही अडचणी येतात, त्या काही त्याच्या स्वभावातून आणि काही परिस्थितीतून निर्माण होतात. आमच्या दोघांशी जवळीक साधून मैत्री करणाऱ्यांची संख्या अगदीच कमी आहे. त्यामुळे सहजतेच्या सोशल लाइफवर मर्यादा येतात. मुंबईच्या महानगरी वातावरणात घडलेल्या या माणसाला औरंगाबादच्या समाजात समरस होण्यासाठी ज्या तडजोडी कराव्या लागल्या असत्या, त्या त्याने कधी केल्या नाहीत. आणि त्याचा नेहमीच काहीसा आक्रमक पवित्रा काही जणांना आकर्षित करत असला तरी बहुतेक जणांना स्वीकारायला कठीण जातो.

या अडचणींना काही जण एका 'आधुनिकतावादी' लेखकाच्या अडचणी म्हणून पाहू शकतील. महानगरी संवेदन विश्वाला श्रेष्ठ मानणे हा त्याचा हट्ट आहे. भौतिक स्तरावर त्याची स्वायत्तता महानगराच्या रस्त्यांना स्वैरपणे पायाखाली तुडविण्यात होते, तर मानसिक स्तरावर तो जगभराच्या कलाकार-लेखक-तत्त्वज्ञांशी परिचित असतो. ही स्वैरपणे फिरणारी व्यक्ती अट्टाहासाने पुरुषी असते. स्त्रियांचे स्थान त्याच्या या विश्वात एक तर लांबून रोमँटिक प्रेम करण्यासाठी, नाहीतर महानगरातील उपेक्षितांच्या जीवनाचे प्रतीक म्हणून वेश्येच्या रूपात अवतरते. ग्रामीण भागातील ऋतुचक्राची, शेतकऱ्याच्या जीवनाची त्याला फारशी ओळख नसते. आपल्या समाजातील धार्मिक परंपरा, रिती-रिवाज याची बरीच माहिती असली तरी त्यांच्याशी असलेले भावनिक नाते प्रामुख्याने संघर्षाचे असते. जाती-उपजातींमध्ये फारसा रस नसतो. आणि जातीच्या अस्मितेच्या राजकारणाविषयी टीकेची दृष्टी असते. हे सगळे वर्णन बऱ्याच प्रमाणात तुळसीला लागू होते. आजच्या बदलत्या सामाजिक-राजकीय परिस्थितीत अशा माणसाला कलाकार म्हणून टिकून राहताना वेगळ्याच प्रकारचा संघर्ष करावा लागतो. शिवाय तुळसीचा आज जगाशी येणारा संबंध नोकरी करणाऱ्याच्या किंवा कार्यकर्त्यांच्या नात्याने आपोआप जोडला जात नाही. जास्त करून कलाकार म्हणून किंवा कुटुंबातला पती, पिता म्हणून येतो. तो सहजासहजी स्वतःला बदलायला तयार होत नाही, म्हणून तो जवळच्या माणसांना अनेकदा ताठर वाटतो. त्याला अनेक वर्षांपासून पैसे कमवण्याच्या दृष्टीने तडजोड करावी लागली नाही, म्हणून व्यवहारातील अनेक गोष्टींबद्दल तो डोळे बंद करू शकतो. आपण रोजच्या जबाबदाऱ्यांमध्ये समतोल साधण्याची धडपड करत असतो तेव्हा त्याच्या प्रतिक्रिया कठोर आणि स्वतःसाठी 'प्रिव्हिलेज'चे स्थान जोपासणाऱ्या असतात.

मला असे वाटते की, तुळसीला या अस्तित्वासंबंधी गेल्या दोन-तीन वर्षांत एका 'क्रायसिस'मधून प्रवास करावा लागला आहे. सर्व काही अत्यंत तीव्रतेने जगण्याच्या त्याच्या अट्टाहासामुळे खूप कष्ट सोसावे लागले त्याला. काही काळ त्याचा मानसिक तोलही बिघडला होता. किंवा आजुबाजूच्या राजकीय वातावरणात मोठे बदल झाले आहेत. त्याच्या पिढीने क्रांतीची जी स्वप्ने पाहिली ती आता आधिकच दूर झाल्यासारखी वाटतात. एवढेच नव्हे तर भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी जी मूल्ये समाजात व्यापक अर्थाने स्वीकारली जात होती, त्यांच्यावर हल्ला होत आहे. फॅसिसिझम नकळत आपल्यामध्ये येऊन बसतो आहे. अशा वेळी साध्या माणसांच्या, बुद्धिजिवींच्या वागण्यात एक भित्रेपणा येतो. खरं बोलणाऱ्याबद्दलचा संशयीपणा वाढतो. पैसेवाले, प्रतिष्ठित, अधिकारप्राप्त असलेल्या मंडळींबद्दलची लाचार भावना वाढते.

अशा वातावरणात तुळसीसारखा माणूस जरा बावरून जातो. त्याचं सगळं खुल्लम-खुल्लं असतं. तो जरासा ताठरही असतो. अशा माणसाच्या जगण्यावरच आघात झाल्यासारखी परिस्थिती असते. अर्थात थोडासा सावरल्यानंतर तो या नवीन वास्तवाला पुन्हा आपल्या पद्धतीने सामोरा जातो.

असा माणूस जेव्हा बदल स्वीकारतो तेव्हा ती त्याच्यासाठी सोपी घटना नसते. पण ती वरवरची देखील नसते. केवळ आजची 'फॅशन' म्हणून तो आधुनिकोत्तरवादी कविता लिहिण्याच्या प्रयत्नात पडणार नाही. मात्र दुसऱ्या लेखकांनी केलेले प्रयोग समजून घ्यायला तो तयार असतोच. त्याचप्रमाणे त्याची बरी-वाईट प्रतिक्रिया अगदी स्पष्टपणे सांगून टाकतो. अशा वेळी प्रशंसा करायलाही कचरत नाही. माझा असा अनुभव आहे की, फारच कमी लोक असे वागतात. त्यामुळे अनेक तरुण, प्रतिष्ठित कवी, नाटककार, चित्रकारांना त्याचे खरे मत ऐकण्यात उत्सुकता असते. पण काही अपवादात्मक लेख सोडले तर टीका लिहिण्यात त्याने फारसा रस दाखवला नाही.

आमचे लग्न झाले तेव्हा तुळसी शहाद्याला श्रमिक संघटनेचे काम करीत होता. १९७८ साली त्याने शहादा सोडण्याचा निर्णय घेतला. कारण त्याला काही काळ वाचन व लिखाणावर लक्ष केंद्रित करायचे होते. मग १९७९ साली आम्ही औरंगाबादला आलो. तेव्हा तो काही दिवस लाल निशाण पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबर जमेल तितके काम करत होता. १९८१मध्ये ओजसचा जन्म झाला आणि मी नोकरी करत असल्यामुळे आणि कुणीही मदतीला नसल्यामुळे तुळसीने बाळाला सांभाळायचे कठीण कामही केले.

ओजस थोडा मोठा झाला तेव्हा तुळसीने औरंगाबादच्या 'अजिंठा' दैनिकामध्ये काही काळ नोकरीही केली. नोकरी पार्ट टाइम असली तरी रात्रीची ड्युटी करून वर्तमानपत्राचे पहिले पान जुळविण्याची सर्व जबाबदारी त्याला सांभाळावी लागायची. तेथून उशिरा घरी आल्यावर तुळसीला त्या दिवशी घडलेल्या गमती, उद्याच्या पेपरमध्ये येणाऱ्या बातम्या, यावर खूप बोलायचे असायचे. त्या दिवसात मीही लवकर झोपायचे आणि रात्री उठून, त्याला जेवण वाढून, त्याच्या सगळ्या गोष्टी ऐकून पुन्हा झोपण्याचा कार्यक्रम असे. या पेपरसाठी तुळसीने राजकारणातील तत्कालीन विषयांवर काही विशेष लेख अगदी आवडीने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने लिहिली. अर्थात, हे लेख आपल्या सृजनात्मक निर्मितीचा भाग होऊ शकत नाही, असे जाहीर करण्यासाठी तो 'ओज पर्व' या टोपण नावाने लिहीत असे. नंतर पगाराच्या बाबतीत फारच उशीर आणि टाळमटाळ होऊ लागली, तेव्हा तुळसीने ही नोकरी सोडून दिली. काही दिवस तुळसीने एका इंग्रजी वर्तमानपत्राचा औरंगाबादमधला बातमीदार म्हणूनही काम केले. तसेच एक-दोन वर्षं तुळसी मुंबईला राहिला, तेव्हा 'नवशक्ति' या दैनिकात त्याने काम केले होते. तर काही दिवस रात्रशाळेत शिक्षक म्हणूनही तो होता.

औरंगाबादेत तुळसीने शिकवण्या कराव्यात असा विषय आमच्यात मधून मधून निघायचा. तुळसीचे इंग्रजीचे वाचन चांगले आहे. गंभीर विषयांवर इंग्रजीत बऱ्याचदा मी त्याला मदत केली आहे. तासन् तास बोलताही येते. शाळा-कॉलेजात असताना त्याने वेळोवेळी परीक्षेत यश मिळवून सचिवालयातली नोकरी आणि त्यातील बढती पक्की केली. पण आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमाबद्दल त्याचे फारसे चांगले मत नाही आणि आता तर त्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून कुणाला शिकवणे खूप जड जाईल. एकदोन वेळा त्याने प्रयत्न केला, पण तो सोडून दिला. विद्यापीठ परिसरातील काही विद्यार्थ्यांशी त्याचा चांगला संवाद होतो. पण शिस्तबद्ध, अभ्यासक्रमबद्ध नाही. ली इलेसिंगर हे अमेरिकेतील संशोधक जेव्हा फुल ब्राईट स्कॉलर म्हणून औरंगाबादला राहिले तेव्हा त्यांनी आपली मराठी भाषेची जाण वाढविण्याच्या दृष्टीने काही टेक्स्ट वाचण्यासाठी तुळसीची नियमितपणे मदत घेतली.

आपण पैसे कमवत नाही म्हणून स्वतःवर कमीत कमी खर्च करावा ही शिस्त तुळसी पाळतो. त्यामुळे बस/शेअर रिक्षाने फिरायला त्याला आवडते. आणि पायीसुद्धा. हे करत  असताना शहरातल्या साध्या माणसांबरोबर गप्पा मारणे हा त्याचा खास छंद. खिशात काही पैसे असल्यास चोर बाजार किंवा फुटपाथवरून तो अगदी चोखंदळपणे कपडे, पुस्तके, चित्रे, मूर्ती मिळवण्यात पटाईत आहे आणि तेवढ्याच सहजजपणाने तो एखादवेळी ते आमच्या एखाद्या मित्राला-मैत्रिणीला देऊनही टाकतो. त्याच्या काही निवडक मित्रांनी आमचे लग्न झाल्यानंतरसुद्ध त्याला वेळोवेळी पैशाची मदत केली आहे. पण ते पैसे घेण्याचा त्याचा हेतू शान-शौकीचा नसून, एक स्वातंत्र्याची भावना राखण्याचा असतो. अधून-मधून दारू पिण्याचा शौक आहे, तीही चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या गप्पा होण्याची शक्यता असेल तर जरा जास्त प्रमाणात. पण दारू नाही मिळाली तरी फारसे वाईट वाटत नाही किंवा त्यासाठी धडपड करत नाही.

कुठल्याही जुन्या विवाहित जोडप्याप्रमाणे आमचा हा एकत्र केलेला प्रवास सुख-दुःखाचा, चढउतारांचा, प्रेमाचा, रागाचा, संघर्ष-समझोत्याचा झाला आहे. पण तुळसीबरोबर एखादा लहानमोठा प्रवास करायला मोठी ताकद आणि चिकाटी लागते. त्यामुळे मुले लहान असताना मी हे धाडस क्वचितच केले. यावर्षी आम्ही वर्षभर आजारपण, अपघात, मानसिक खळबळ याच्यातून गेल्यानंतर चौघांची आठ दिवसांची दक्षिणेकडची 'ट्रिप' निश्चित केली. दक्षिणेकडील काही स्थळे पाहून पॉण्डिचेरी गाठायचे ठरले. मग मी आणि ओजस मिळून प्रवासाचे वेळापत्रक, आरक्षण, खर्चाची आखणी केली आणि आम्ही निघालो. तुळसीचे या तपशिलाशी काही देणे-घेणे नसते. त्याची भूमिका असते, 'मी तर साधा माणूस आहे. मला काहीही चालते. तुम्ही ठरवा.' मग सगळे निर्णय आमच्यावर ढकलल्यानंतर तो टीका करायला मोकळा असतो. जे चांगले घडेल त्याचे 'क्रेडिट' घ्यायला मागेपुढे बघत नाही. 'बरं झालं तुम्ही माझं ऐकलं' या प्रकारचा आम्हाला तिघांना भरपूर वैताग येता येता आम्ही पॉण्डिचेरीला पोहचेपर्यंत तशी मजाही आली. मुलांनी तुळसीच्या या वागण्याला जोरदार विरोध करायला सुरुवात केली होती. मग एका हॉटेलच्या रूममध्ये अगदी लहान मुलासारखे, 'मग मी आता जातो' इथपर्यंत वेळ आली होती. नंतर मात्र समुद्राचे सान्निध्य आणि पॉण्डिचेरीचे आगळे वेगळे शांततेचे वातावरण यांनी आम्हाला घेरले. आम्ही विसावलो, आमचा सगळा ताण-थकवा निघून गेला.

परत आल्यानंतर तुळसीचे पुन्हा सुरू 'सुटी तशी बरी गेली, पण काहीकाही ठिकाणी नीट जेवायला मिळाले नाही. आणि शेवटी महाबलीपुरम राहिलेच.'

लिहिण्यासारखे तसे खूप आहे. तुळसीबरोबरच्या जीवनाला वेगवेगळे रंग आहेत. आमच्या दोघांच्या एकमेकांच्या कुटुंबियांशी झालेला संपर्क, देवाण-घेवाण, टकरी, प्रेमाचे संबंध या विषयाला मी हातच लावला नाही. आता मुलेही मोठी झाली आहेत. तुळसीचा हा अस्वस्थपणा टिकून राहील, त्याच्या सृजनशीलतेला येत्या वर्षात नवीन दिशा मिळतील आणि आमचे सहजीवन कसेही असले तरी त्यात नवीन काहीतरी घडत राहील, याची मला खात्री आहे.